Breaking News
दिवसाआड पाणी येणार
पनवेल ः डिसेंबरमध्येच धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ पनवेलकरांवर आली आहे. सध्या धरणांमध्ये पाणी आहे परंतु भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
नगरपालिकेतून महापालिकेत रुपांतरीत झालेल्या पनवेल पालिकेचे कार्यक्षेत्र वाढल्याने रहिवाशांना पिण्याच्या र पाण्याची कमतरता भासू लागली आहे. पाणी समस्याने डिसेंबरपासूनच डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. पालिका क्षेत्राला सध्या 240 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना त्यात 100 दशलक्ष लिटर पाणी तुटवडा जाणवू लागला आहे. तळोजामधील नागरीक पाण्याच्या टंचाईने बेजार झाले आहेत. या उपनगराला आठ दशलक्ष पाण्याची आवश्यकता असताना केवळ अडीच ते तीन दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन नसताना सिडकोने या भागात 25 हजार घरांच्या महागृहनिर्मितीची घोषणा केली आहे. तसेच आणखी गृहप्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे मूळ पनवेलकरांच्या तोंडचे पाणी विस्तारीत नागरिकरणाने पळविले आहे. गेल्या वर्षी पनवेलमधील पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले होते. पालिकेला नवी मुंबई पालिकेकडे पिण्याचे पाणी टँकरने मागण्याची वेळ आली होती. नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणाची जलवाहिनी याच पनवेल शहराच्या पश्चिम बाजूकडून जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मोरबे, हेटवणे, एमआयडीसी आणि स्वत:च्या देहरंग धरणातून पनवेलकरांची तहाण भागविणार्या पालिकेने भाविष्यातील पाणीटंचाईची चाहूल आत्तापासून ओळखून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिका सध्या होणार्या पाणीपुरवठ्यात कपात करून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता आहे.
भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एक दिवसआड पाणीपुरवठा तसेच शहरातील तलावांचे पाणी संरक्षित केले जाणार आहे. कायमस्वरुपी पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे काम सुरु असून त्याला दोन अडीच वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai