Breaking News
पनवेल : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये पुरसदृष्यस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. या गोष्टीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिका आयुक्तांनी सुरक्षित पनवेलचा विकास आराखडा तयार केला आहे. यासाठी सुमारे 125 कोटी रुपये पालिका खर्च करण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
शहराला पुरापासून वाचविण्यासाठी मागील वर्षी 19 ऑगस्टला झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपने याबाबत ठराव मांडल्यानंतर सभागृहाने त्याला मान्यता दिली होती. मागील वर्षी 22 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत पनवेल महापालिका क्षेत्राचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमध्ये पाणी शहराबाहेर कसे काढावे, खाडीक्षेत्रातील पाणी नियंत्रण भिंतीने कसे थांबवावे, याचे नियोजन करण्यात न आल्याने तसेच शहरातील गटारे स्वच्छ केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून व विरोधी सदस्यांकडून केला गेला. यावर पालिकेच्या स्थापत्य विभागातील अभियंत्यांनी विविध पर्याय सुचविले होते. मात्र अतिवृष्टीमध्येच झालेल्या सर्वसाधारण सभेत पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यापुढे ही अवस्था पनवेल शहर व पालिका क्षेत्रात होणार नाही यासाठी सदस्यांना त्यांच्या परिस्थितीतील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पर्याय विचारले होते. याच बैठकीत सदस्यांनी सुचविल्यानंतर पावसाळ्यात पाणी भरणारी 45 ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेने यश इंजिनीअरिंग या कंपनीला याबाबतचा अहवाल बनविण्याचे काम दिले.
पनवेल पालिकेने हा आराखडा बनविला असला तरी यामध्ये सीआरझेड, कांदळवने असणार्या ठिकाणी काम करण्यासाठी केंद्र व इतर प्राधिकरणांची रीतसर परवानगी लागणार आहे. पालिकेला परवानग्यांचे शिवधनुष्य पेलावे लागेल. परवानगीनंतर कामे करण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. मात्र परवानग्यांपूर्वी सभागृहातील सदस्यांसमोर मंजुरीसाठी हा आराखडा ठेवण्यात येईल. पावसाळ्यात पनवेल शहरावर अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून पालिकेने ठोस उपाययोजनांवर भर दिला आहे असे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai