Breaking News
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा येथे पदपथावर दारूच्या बाटल्यांचा व सिगारेटच्या पाकिटांचा खच पडला आहे. ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साठले आहेत. तसेच पदपथावर धुळीचे थर साचले आहेत. त्यामुळे स्वच्छ शहर अभियानाचा प्रशासनाला विसर पडला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हजारो कोटी खर्च करून सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण तसेच काँक्रीटीकरण करण्यात आले. नागरिकांना सुरक्षितरीत्या महामार्ग ओलांडता यावा, याकरिता ठिकठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. सानपाडा येथे उभारलेल्या पादचारी पुलाजवळ अवैध पार्किंगचे पेव फुटले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी केली जात आहेत. त्याकडे वाहतूक विभाग तसेच संबंधित प्रशासनाकडून सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. येथील पदपथ आता मद्यपींचा अड्डा बनू पाहत आहे. अवजड वाहनांच्या आडून रात्रीच्या वेळेस मद्यपान तसेच धूम्रपानाचे प्रकार घडत असून, दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच सिगारेटची रिकामी पाकिटे तेथेच टाकली जात आहेत. त्यामुळे येथून जाणार्या महिलांचा तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी घटना घडण्याची पोलीस वाट पाहत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणी ठोस भूमिका घेण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे.
महामार्गावर या ठिकाणी पदपथाला जोडून हरित पट्टा विकसित करण्याचे काम सुरू आहे. अनेक दिवसांपासून हे काम रखडलेले असल्याने तसेच सर्व्हिस रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग होत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली आहे. हरितपट्ट्याचे काम सुरू असताना पदपथावर टाकलेले दगड-मातीचे ढिगारे अनेक दिवसांपासून तसेच आहेत. स्वच्छता होत नसल्याने अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग महामार्गावर तसेच पदपथावर साठलेले आहेत. तसेच धुळीचे थरच्या थर साचले असल्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे त्रासदायक ठरत आहे. सायन-पनवेल महामार्गावरील हा पट्टा असुविधांनी वेढला असून मोठ्या जोशात सुरू असलेल्या स्वच्छ शहर अभियानाचे वाभाडे काढणारा आहे.
संबंधित विभागाने या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai