Breaking News
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करुन आपल्या भावाच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच नागरिकांनाही त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
‘मी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. ते ज्या प्रकारे काम करत आहेत. ते योग्य प्रकारे करत आहेत.’ अशा शब्दात राज यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. ‘जी लोकं डॉक्टरांवर हात उचलत होते, त्यांना आज जाणीव झाली असेल. लोकांना आज गांभीर्य समजत नाही. जनता कर्फ्यू टेस्ट केस होती, तरी लोकांनी ऐकलं नाही तर कडक पावलं उचलावी लागतील. व्हायरस पसरला तर तो आवरण्यासाठी यंत्रणा आहेत का? जनता कर्फ्यूनंतर टाळ्या वाजवण्यासाठी लोकं टोळक्याने बाहेर येत होते. जल्लोष करत होते. लोकांना काही गांभीर्य आहे की नाही? प्रत्येकाच्या घरावर टकटक झाली तरच आपण ऐकणार का?’ असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थितीत केला.
‘कोरोना आपल्या मागे हात धुऊन लागला आहे. जनतेला हात जोडून विनंती आहे. हे प्रकरण सहज घेऊ नका. निर्बंधांची 31 मार्चची तारीख पुढे जाणार असंच चित्र आहे. आज जी लोकं टोलनाक्यावर गर्दी करत आहेत. त्यांना विनंती घरी बसा. जे काही चालू आहे ते आपल्या जगण्यासाठी चालू आहे’, असं आवाहनही राज ठाकरे यांनी लोकांना केलं.
’डॉक्टरांना परिवार नाही का? जीव धोक्यात घालून ती लोकं आपल्यासाठी लढत आहेत. पण काही लोकं रस्त्यावर उतरून पोलिसांसोबत हुज्जत घालत आहेत. ज्या गोष्टी आपणहून पाळायला पाहिजे त्या पाळणं आवश्यक आहे. अनेकांच्या हातावर घरी राहण्यासाठी स्टँप मारले आहे आणि ती लोकं बिंधास्त बाहेर फिरत आहे. मूठभर लोकांना जर समज येत नसेल तर सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.’ अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai