Breaking News
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा ; जिल्ह्यांच्या सीमाही बंद
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जिल्ह्याजिल्ह्यातील सीमाही बंद करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील नागरिकांना संबोधित करताना जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांचे आभार मानले. कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे, मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. काल राज्यात 144 कलम लावले होते. आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागते आहे. खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या. आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली. देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे.दरम्यान, या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळ्यात आले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरुच राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. खुपदा विनंती करूनही पालन होत नसल्याने मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे. ही कठोर पाउले केवळ जनतेच्या हितासाठी असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai