Breaking News
खारघर : राज्यात होणार्या वीजटंचाई, भारनियमन व सुरक्षा अनामत रक्कम वसुलीबाबत सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खारघर मंडल भाजपने सोमवारी सायंकाळी सात वाजता शहरातील शिल्प चौकात कंदील लावून आंदोलन केले.
वीजटंचाईला राज्य सरकार जबाबदार असून अघोषित भारनियमनामुळे हजारो कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सुरक्षा अनामत रकमेत दुप्पट वाढ करून महाविकास आघाडी सरकारने नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादण्याचा आरोप यावेळी ब्रिजेश पटेल यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ व अनियोजित कारभारामुळे तीन आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हवालदिल झाले असून भारनियमनामुळे ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना त्रास होतो. याचा निषेध करण्यासाठी कंदील आंदोलन केल्याचे भाजपचे शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांनी सांगितले. यावेळी खारघर मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, महिला व बाल कल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, नीलेश बाविस्कर, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा संध्या शारबिद्रे, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai