महारेराचा विकासकांना दणका!
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 30, 2024
- 698
मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण न करता घर खरेदीदारांची अडवणूक करणाऱ्या विकसकांना महारेराने चांगलाच दणका दिला आहे. त्यानुसार महारेराने गेल्या 14 महिन्यांत घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईचे तब्बल 125 कोटी रुपये विकसकांकडून वसूल करून दिले आहेत. त्यामुळे संबंधित घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशातील स्थावर संपदा विनिमयामक प्राधिकरणात कोट्यवधी रुपयांची विक्रमी नुकसानभरपाई वसुली करणारे महारेरा एकमेव प्राधिकरण आहे. महारेराने आतापर्यंत 117 प्रकल्पांतील 273 तक्रारीपोटी एकूण 160 कोटी वसूल केलेले आहेत. ही वसुली आणखी प्रभावीपणे करता यावी, म्हणून यापुढे जारी केल्या जाणाऱ्या प्रत्येक वॉरंटमध्ये संबंधित विकसकाचा बँक खाते क्रमांकही आवर्जून नमूद करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. त्यामुळे वसुलीसाठी महसूल यंत्रणेला संबंधित विकसकाच्या खात्यावरही टाच आणणे शक्य होणार आहे.
महारेराने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात घरखरेदीदारांच्या नुकसानभरपाईच्या वसुलीसाठी सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. ते सातत्याने सर्व संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्कात असतात. महारेराने या वसुलीला सर्वोच्च प्राधान्य दिलेले असून प्रत्येक खातेप्रमुखांच्या बैठकीत याचा आढावा घेतला जातो. तसेच गरजेनुसार महारेरा संबंधित अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलावले जाते. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यातील नुकसानभरपाई वसुलीची प्रकरणे मार्गी लावली जातात, असे महारेराकडून सांगण्यात आले.
- 661 कोटींच्या वसुलीसाठी वॉरंट
महारेराने नुकसानभरपाईसाठी आतापर्यंत 421 प्रकल्पांतील 661 कोटी 15 लाख रुपयांच्या वसुलीसाठी 1,095 वॉरंट्स जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत 117 प्रकल्पांतील 273 वॉरंट्सपोटी एकूण 160 कोटी वसूल झाले आहेत.
- मुंबई उपनगरात सर्वाधिक प्रकल्प
मुंबई उपनगरातील सर्वाधिक प्रकरणे असून यात 114 प्रकल्पांतील 298 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी 434 वॉरंट्स जारी करण्यात आलेले आहेत. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक असून तेथील 123 प्रकल्पांतील 181 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी 239 वॉरंट्स जारी करण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय करण्यात आलेली वसुली
- मुंबई शहर : 17 प्रकल्पांतील 64 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी वॉरंट काढले आहेत, त्यापैकी 21 कोटींची वसुली झाली.
- मुंबई उपनगर : 114 प्रकल्पांतील 298 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी 434 वॉरंट्स काढले असून आतापर्यंत 71 कोटींची वसुली करण्यात आली.
- पुणे : 123 प्रकल्पांतील 181 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी 239 वॉरंट्स काढले असून आतापर्यंत 38 कोटी रुपये वसूल केले.
- ठाणे : 77 प्रकल्पांतील 58 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी 55 वॉरंट्स काढले असून 38 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
- पालघर : 30 प्रकल्पांतील 18 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी 65 वॉरंट्स दिली असून त्यापैकी दोन कोटींची वसुली केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai