Breaking News
नवी मुंबई - शून्य कचऱ्याचा प्रारंभ माझ्यापासून या नवी मुंबईतील शाळा-शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत 32 शाळांतील 5146 विद्यार्थ्यांनी 8720 प्लास्टिक बाटल्यांमध्ये तब्बल 961 किलोहून अधिक वजनाच्या तुकड्यांच्या स्वरुपातील प्लास्टिक संकलीत केले. या उपक्रमामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांचा नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथील विशेष समारंभात गौरव करण्यात आला.
मुलांमध्ये लहान वयापासून स्वच्छतेसोबतच प्लास्टिकचे दुष्परिणाम त्यांना समजून प्लास्टिक प्रतिबंधाविषयी त्यांची मनोभूमिका तयार व्हावी यादृष्टीने शून्य प्लास्टिकची सुरुवात माझ्यापासून हा अभिनव उपक्रम राबविला जात असून या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याची प्लास्टिक बॉटल घेऊन त्यामध्ये चॉकलेट्सचे रॅपर, वेफर्सचे प्लास्टिक पॅकेट्स, दुधाच्या पिशव्या अथवा सॅशेचे कापलेले तुकडे, प्लास्टिकचे लहान लहान तुकडे जमा करावेत व ती बाटली पूर्ण भरल्यानंतर आपल्या वर्गशिक्षकांकडे जमा करावी ही या उपक्रमाची कार्यपध्दती आहे. यामध्ये इतरत्र फेकले जाणारे व सहजपणे दुर्लक्षित होऊ शकेल असे छोट्या छोट्या तुकड्यांच्या स्वरुपातील प्लास्टिक विद्यार्थ्यांमार्फत जमा होऊन पर्यावरणाची संभाव्य हानी टाळली जात आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
या शाळा-शाळांमधून विद्यार्थ्यांमार्फत जमा होणाऱ्या बाटल्या पालिकेकडे संकलीत केल्या जात असून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येत आहे. या कामी हार्ट फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. इलिस जयकर यांच्यामार्फत विशेष योगदान दिले जात असून त्याबद्दल त्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai