रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात
- by मोना माळी-सणस
- Jul 20, 2024
- 637
मुंबई-नाशिक महामार्गाची शहापुर-आसनगाव दरम्यान चाळण
मोना माळी/सणस
मुंबई ः मुंबई ते नाशिक दरम्यानचा 150 किलोमीटरचा चार ते साडेचार तासांचा प्रवास तेथील खड्ड्यांमुळे, संथपणे सुरु असलेल्या कामांमुळे सध्या आठ ते दहा तासांवर गेला आहे. वाहतूक कोंडीत वाहनधारक सात-आठ तास अडकून पडत असल्याने पैसा, वेळ व इंधन वाया जात असून हा प्रवास वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. मात्र अशा खड्डेमय आणि दुरावस्था झालेल्या रस्त्यावरील टोल वसूली काही थांबलेली नाही. महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून दिवस प्रवासात जात असला तरी वसूली जोरात सुरु असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत रस्ता दुरुस्त होऊन प्रवासासाठी मोकळा होत नाही तोपर्यंत टोल रद्द करा अशी मागणी जोर धरु लागली आहे.
मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांना जोडणारा मुंबई-नाशिक महामार्ग हा महत्वाचा मार्ग आहे. मात्र या मार्गावरील प्रवास आता डोकेदुखी ठरु लागला आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे. सध्या रस्त्याची विविध कामे सुरू असल्याने वाहतुकीच्या समस्येत भर पडत आहे. मोठमोठे खड्डे आणि वाशिंद ते आसनगाव दरम्यान उड्डाणपुलाचं संथ गतीनं सुरू असलेले काम, यामुळे ही कोंडी होत आहे. (पान 7 वर)
तिथं एक ते दोन मीटर परिघाचे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहनांचा वेग अक्षरशः ताशी एक ते दोन किमीवर येतो. वाहनांच्या आठ ते दहा किमीच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे चार ते साडेचार तासांचा प्रवास सात ते आठ तासांवर गेला आहे. या वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यावसायिकांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. आसनगाव शहापूर हे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड दीड तासाचा अवधी लागत आहे. संपूर्ण महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असला तरी महामार्गावरील टोलवसूली काही थांबलेली नाही. ती सुरुच असल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत या मार्गाची पुर्णपणे दुरुस्ती होत नाही तोपर्यत येथील टोलवसूली रद्द करा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन
- या महामार्गाच्या या अवस्थेला महामार्गाचे अधिकारीच जबाबदार असून पंधरा दिवसांत या रस्त्याची संपुर्ण दुरुस्ती करावी तोपर्यंत टोल बंद ठेवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा शिवसेना उबाठा गटाच्या शिष्टमंडळाने दिला आहे. शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक देत अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले आहे.
- दुरावस्थेविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी गुरुवारी टोलनाक्याविरोधात आंदोलन करुन वाहने टोल न भरता सोडली. घोटी टोलनाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
- कोंडीमुळे प्रदुषणात भर
या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रदुषणात भर पडत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. काहींना अपघातामुळे अपंगत्व आले आहे. या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. ध्वनी, वायु दोन्ही प्रदुषण वाढत असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. - अवजड वाहनांचा चक्काजाम
ठाणे जिल्ह्यात महामार्गालगतच्या गोदामांमुळे अहोरात्र अवजड वाहनांची महामार्गाने ये-जा सुरू असते. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. त्यात खड्यात काही वाहने अडकून पडत असल्याने आणखी वेळ जात आहे. शिवाय वाहनांचा देखभाल दुरुस्ती खर्चही वाढत आहे. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याची तयारी केली जात असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाकडून सांगण्यात येत आहे. - मुंबई आणि नाशिक 150 किलोमीटरचा हा महामार्ग 2009 पासून कार्यरत आहे. सरकार आता हा चौपदरी महामार्ग आठ लेनमध्ये विकसित करत आहे. काम 2023 मध्ये सुरू झाले. महामार्गाचा विस्तार 2024 अखेरस पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- या प्रकल्पावर 589 कोटी खर्च झाला आहे. या रस्त्याची डिझाईन आणि बांधकामाचा ठेका मे. मुंबई नाशिक एक्सप्रेसवे लि. या कंपनीला देण्यात आला आहे. 2006 ते 2026 पर्यंत याची देखभाल दुरुस्ती, टोल वसूलीची जबाबदारी सदर कंपनीची आहे. वसूली सोडली तर देखभाल दुरुस्तीच्या नावे बोंबाबोंब आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस