घणसोली बनले समस्यांचे रेल्वेस्थानक
- by मोना माळी-सणस
- Jul 26, 2024
- 477
रेल्वे भुयारी मार्गात झरे, अस्वच्छता; सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी हवालदिल
नवी मुंबई ः ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गातील स्थानके अवाढव्य असली तरी त्यांना वर्षभर गळती लागलेली असते. त्यातील घणसोली रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गैरसोयी असून अस्वच्छता, तुटलेल्या टाईल्स, भुयारी मार्गात नेहमीच असलेली गळती, अशा अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटनांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने घणसोलीकरांनी संताप व्यक्त केला आहे.
पावसाळ्यात रेल्वे स्थानकांची गळती छते, भिंतीतून वाहणारे झरे आणि यामुळे सबवे मध्ये साठणारे पाणी यातून वाट काढत करावा लागणारा रेल्वेचा प्रवास हा घणसोली, तुर्भे, कोपरखैरणे येथील प्रवाशांना नित्याचाच झाला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ही स्थानके दिसायला अवाढव्य असली तरी ती वर्षभर गळतच असतात. घणेसोली रेल्वे स्थानकात तर फलाटावरुन खाली उतरण्यासाठी असलेल्या जिन्यावर नेहमीच पाणी असल्याने अनेकदा प्रवाशी घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये वृद्ध, गरोदर स्त्रियांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सध्यातर पावसाळा सुरु असल्याने गळणाऱ्या भिंतीना झऱ्याचे स्वरुप आले आहे. सतत यातून पाणी पडत असल्याने सबवेमध्ये पाणी साचून राहते. पावसाचा जोर जेवढा जास्त तेवढे पाणी जास्त साचते. अशा साठलेल्या पाण्यातून ऐन कामाच्यावेळी वाट काढणे जिकरीचे होते. या ओलाव्यातून फलाट गाठताना प्रवाशांची दमछाक होते. पाय घसरुन अनेक प्रवाशी पडतात. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणत्याही प्राधिकरणांना वेळ नसल्याची खंत प्रवाशी व्यक्त करत आहेत. तसेच फलाटावरही गळक्या छतातून पाणी पडत असल्याने नागरिकांना भिजायला होते.
घणसोलीतील तिकीट घराबाहेर पाणी साठल्याने मिनी स्विमिंग पुलाचे स्वरुप येते. त्या साठलेल्या घाणीच्या पाण्यातून जावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. तसेच या स्थानकातील भुयारी मार्गातील कचरापेट्या गायब झाल्या असून भिंती पिचकाऱ्यांनी लाल झाल्या होऊन अस्वच्छता पसरली आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही. भटक्या श्वानांचा वावर वाढला असून गेल्या आठवड्यात एका महिलेला त्याने चावा घेतल्याने दुखापत झाली. अशा गैरसोयीने ग्रासलेल्या रेल्वे स्थानकांला कोणी वाली आहे का असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
- प्रवाशांचा रेल रोको आंदोलनाचा इशारा
घणसोली रेल्वे स्थानक व आवारातील परिसरात निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती व समस्या रेल्वे प्रवासी हितवर्धक मंडळ यांच्याद्वारे सिडको प्रशासनाला निवदेन देवून निदर्शनास आणून देण्यात आल्या. तसेच या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकारी, ठेकेदारावर कारावाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच या समस्यांचा निपटारा लवकरात लवकर न झाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी संबंधित प्रशासनाला दिला - सह्यांची मोहिम
समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या या रेल्वे स्थानकांमध्ये सेवासुविधा मिळाव्यात म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार सिडको प्रशासनाकडे मागणी केली आहे. निवदेन देवून या समस्या सोडविण्याची विनंती केली. मागील दोन तीन वर्षापासून समाजसेवक कृष्णा पाटील हे या समस्यांवर आवाज उठवत असून सिडकोकडे पत्रव्यवहार करत आहेत. मात्र सिडको त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नसून समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने पाटील यांनी बुधवारी रेल्वे स्थानक परिसरात सह्यांची मोहिम राबविली. त्याला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांनी या समस्यांविषयी रेल्वे मंत्रालयाकडेही तक्रार केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस