Breaking News
विकास आराखड्यावरील हरकतींवर सुनावणी सुरु
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप विकास योजनेवर प्राप्त सूचना व हरकतींची सुनावणी 14 मार्चपासून सुरु झाली आहे. विभागनिहाय ही सुनावणी 29 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. मात्र तीन दिवस झालेल्या सुनावणीत 75 टक्के हरकतदार गैरहजर राहिल्याचे चित्र होते.
प्रारुप विकास योजनेवर नागरिकांकडून 15890 सूचना व हरकती प्राप्त झाल्या असून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 28 (2) अन्वये सुनावणी देण्यासाठी संचालक, पुणे यांचे सूचनेनुसार नियोजन समिती गठीत
करण्यात आलेली आहे. सदर सुनावणी समितीची पहिली बैठक 14 फेब्रुवारी रोजी पार पडलेली असून नागरिकांच्या हरकती व सूचना यावर प्रत्यक्ष सुनावणी घेण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. सुनावणीचे वेळापत्रक यापूर्वीच सर्व माध्यमांतून जाहीर करण्यात आले असून प्रत्येक सूचना आणि हरकतदारांना नोटीसाही बजाविण्यात आलेल्या आहेत. सुनावणीची कार्यवाही सुयोग्यरितीने पार पाडावी याकरिता संपूर्ण नियोजन करण्यात आले असून प्राप्त सूचना व हरकतींच्या संख्येनुसार विभागनिहाय दिनांक आणि वेळ सूचना व हरकतदारांना कळविण्यात आलेली आहे.
14 ते 16 मार्च दरम्यान ऐरोली, बेलापुर, घणसोली, कोपरखैरणे व वाशी येथील हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी झालेल्या सुनावणीमध्येे एकूण 2522 हरकतीवर चर्चा होणार होती. मात्र यापैकी 1839 हरकतदार गैरहजर राहिल्याने केवळ 683 हरकतींवर सुनावणी झाली. एकंदरीत 75 टक्के हरकतदारांनी सुनावणीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. तर दूसरीकडे काही हरकतदार हे हरकतींबाबत अनभिज्ञ होते तर काही जणांच्या नावे बोगस हरकती नोंदवल्या गेल्याची चर्चा पालिकेत होती. परिणामी, याप्रकरणी काही जणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे सदरच्या हरकती नोंदवल्या कुणी? यामागे काही षडयंत्र आहे का? अशी चर्चांना नागरिकांमध्ये सुरु होती.
जागरूक लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्याकडून आलेल्या सूचना व हरकतींवर सुनावणी घेऊन शहर विकासाला नियोजनबध्द सुयोग्य गती मिळेल असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. 29 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai