Breaking News
नवी मुंबई ः एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून, हापूससह इतर आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मागील आठवड्यात 4 ते 6 डझन आंब्याची विक्री 1500 ते 2500 रुपयांना होत होती. आता 800 ते 2000 रुपयांवर विक्री होत असून, प्रतिडझन 200 ते 500 रुपयांनी उपलब्ध झाले आहेत. हापूस दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने खवय्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यंदा हापूस आंब्याचे उत्पादन चांगले असेल अशी अपेक्षा केली जात होती. परंतु यंदाच्या हंगामाला लहरी हवामानाचा फटका बसल्याने यंदा अवघे 16 ते 18 टक्के हापूसचे उत्पादन आहे. अवकाळी पाऊस, हवामान बदल, उष्ण वातावरणाने इतर राज्य, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भागातील आंबा यावर्षी कमी आहे. आता हापूस आंब्याच्या हंगामाचा 10 दिवसांचा कालावधी राहिला असून गेल्या तीन चार दिवसांपासून बाजारात कोकणातील सिंधुदुर्ग आणि रायगड येथील आंब्याची आवक वाढली आहे. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र राज्यातील 50 हजारांहून अधिक पेट्या दाखल होत आहेत, तर इतर राज्यातील 40 हजारांहून अधिक पेट्यांची आवक आहे. वातावरणात उष्णता वाढत आहे, त्यामुळे आंबा लवकर तयार होत असून बाजारात दाखल होत आहे. मार्चच्या तुलनेत परिपक्व आणि कमी दरात आंबे उपलब्ध होत आहेत. मे अखेरीपर्यंत बाजारात हापूस आंब्याची आवक राहील. मागील आठवड्यात 4-6 डझनला 1500-2500 रुपये दर होता, तेच आता 800-2000 रुपयांनी विक्री होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai