Breaking News
दीड वर्षात 9 हजार 398 वाहनांवर कारवाई
नवी मुंबई : शहराचा क्वीन नेकलेस असलेला पामबीच मार्गावर अपघातांची संख्याही वाढतीच असते. येथील वेगमर्यादा ओलांडून सूसाट वाहने चालविणाऱ्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळते. गेल्या दिड वर्षात अतिवेगाने वाहने चालविणाऱ्या 9 हजार 398 वाहनांवर कारवाई केली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने नोव्हेंबर 2021 पासून ते एप्रिल 2023 दरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत या कारवाया केल्या आहेत.
पामबीच मार्गावर वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अनेकदा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. अनेकदा भरधाव वाहनचालकांकडून सिग्नल तोडल्यानेदेखील अपघात घडले आहेत. सर्वाधिक अपघात हे वेेगमर्यादा ओलांडल्याने घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे पामबीच मार्गावर 60ची वेगमर्यादा राखण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक खासगी कार, दुचाकी यांच्याकडून वेगमर्यादा तोडली जात आहे. त्यातच काही परवानगी नसलेल्या बसदेखील पामबीच मार्गावरून उघडपणे सुसाट धावत आहेत.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील दीड वर्षात तब्बल 9 हजार 398 वाहनचालकांवर केवळ वेगमर्यादा ओलांडल्याप्रकरणी कारवाई केली आहे. येत्या काळात पामबीच मार्गावर बसवल्या जाणाऱ्या स्पीड कॅमेराच्या मदतीने या कारवाया केल्या जाणार आहेत. त्यामुळे 24 तास पामबीच मार्गावरील वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. वाहनचालकांच्या वेग मर्यादेला आवर घालणे गरजेचे असून कठोर दंडाची शिक्षाही देण्याची तरतूद असावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai