Breaking News
मच्छीमारांच्या प्रवेशास बंदी ; प्रतिबंधित क्षेत्राचे लावले फलक
नवी मुंबई ः वाशी गावाभोवती असलेल्या खारफुटीला अधिसूचित राखीव वन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात खाडी किनाऱ्याला लागून 10 फूट उंचीची भिंत बांधली जात असून येथे प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली असल्यामुळे वाशी गावातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
खाडी किनारी वसलेल्या नवी मुंबई शहरातील गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन हे मासेमारी आहे. शहराला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्यामुळे गावातून थेट खाडीत जाऊन मासेमारी केली जाते. मात्र यामुळे खाडी किनारी असलेली खारफुटी आणि जैवविविधतेत मानवी हस्तक्षेप वाढत असल्याने वाशी खाडी किनारी संरक्षित भिंत उभारली जाते आह. या भिंतीमुळे पिढ्यान् पिढ्या खाडीकिनारी मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.या संरक्षण भिंतीमुळे मच्छीमारांना द्राविडी प्राणायाम करून खाडीत मासेमारीसाठी जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि मेहनत वाया जाणार आहे. यावर कोळी बांधवांनी आक्षेप घेतला आहे.
पिढ्यान पिढ्या जपलेल्या पाण्यावर, समुद्रावर, जंगलावर आणि जमिनीवर गावकऱ्यांचा हक्क आहे. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वनविभाग त्यांच्या जगण्याचा अधिकार हिसकावून घेत आहे. त्यामुळे भिंत बांधली तर खाडीत मासे पकडायला कोठून आणि कसे जाणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. वाशीपाठोपाठ ऐरोली गावाच्या खाडीकिनारीदेखील अशी भिंत बांधण्यात येणार असल्याची चर्चा गावागावात सुरू आहे. कोपरखेरणे, घणसोली, दिवाळे, सारसोळे गाव याचबरोबर पनवेल आणि उरणमधील सर्व सागरी गावे अशाच प्रकारे बंदिस्त केली जाणार असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai