Breaking News
संदीप नाईक आणि विजय नाहटा प्रतिक्षायादीत
नवी मुंबई ः भाजपची पहिली यादी सोमवारी प्रसिद्ध होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. अजूनही महायुतीच्या वाटाघाटी सुरु असल्या तरी 60 उमेदवारांची यादी भाजपने प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ऐरोलीतून गणेश नाईक तर बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान, नाहटांचेही पक्षांतर लांबल्याने संदीप नाईक व विजय नाहटा यांना पुढच्या निवडणूकीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
केंद्रिय निवडणुक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंड राज्यांची विधानसभा निवडणुक जाहीर केली आहे. महाराष्ट्रात ही निवडणुक 20 नोव्हेंबरला होणार असून तिचा निकाल 23 नोव्हेंबरला ठेवण्यात आला आहे. उमेदवारांना नामांकन पत्र भरण्यासाठी 29 ऑक्टोबर ही अंतिम तारीख असून नामांकन पत्र 4 नोव्हेंबरपर्यंत मागे घेण्याची मुदत आहे. निवडणुक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली असली तरी अजुनही महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये सीट शेअरींग फॉर्मुला कायम झाला नसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे शेवटच्या क्षणांपर्यंत उमेदवार निश्चित न झाल्याचा फटका अनेक पक्षांना बसला होता.
भाजपने त्यामुळे आपल्या 60 उमेदवारांची यादी कायम केली असून ती सोमवारपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळेल व बंडखोरी जरी झाली तरी त्याबाबत निश्चित ठोस उपाययोजना करता येतील हे गृहित धरुन भाजपने सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, संपुर्ण नवी मुंबईचे लक्ष लागून राहिलेल्या बेलापुर व ऐरोली येथील उमेदवारी भाजपने निश्चित केली असून एक घर एक तिकीट या धोरणाअंतर्गत गणेश नाईक यांना ऐरोलीतून तर बेलापुरमधून मंदाताई यांची उमेदवारी निश्चित केल्याचे सुत्रांकडून कळत आहे. दरम्यान, बेलापुरमधून उमेदवारीची अपेक्षा ठेवणाऱ्या संदीप नाईक यांना सबुरीचा सल्ला पक्षाकडून देण्यात आला आहे. विजय नाहटा यांचाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश लांबल्याने त्यांच्याही उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai