Breaking News
नवी मुंबई : मुंबई-नवी मुंबई जोडणाऱ्या अटल सेतूवरुनही पुन्हा एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करुतुरी श्रीनिवास असं या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तो खासगी नोकरीस असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अटल सागरी सेतूवरुन प्रवास करताना नयनरम्य दृश्य प्रवाशांचं लक्ष वेधून घेते. असं असतानाच आता हा पूल वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. पर्यटक आणि प्रवासासाठी महत्त्वाचा ठरलेल्या या पुलाचा उपयोग काही जण आपलं जीवन संपवण्यासाठी करत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. मार्च महिन्यात 43 वर्षीय डॉक्टर महिला किंजल शाहने अटल सेतूवरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली होती. लाख प्रयत्न करुनही किंजल शाहची बॉडी शोधण्यात शोध पथकाला अपयश आले होते. आता अशीच एक घटना पुन्हा अटल सेतूवर घडली आहे.
एका व्यक्तीने अटल सेतूवरुन खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात उडी मारली. नवी मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यातच आता या व्यक्तीने उडी मारल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवार 24 जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. करुतुरी श्रीनिवास असं या व्यक्तीचं नाव आहे. मुंबईकडून सुमारे साडे तेरा किलोमीटरच्या अंतरावर अटल सेतूवरुन जाताना त्याने त्याची टाटा नेक्सॉन कार अटल सेतूवर थांबवली. तो कारमधून खाली उतरला. त्याने कोणताही विचार न करता, आजूबाजूला कुठेही न पाहता अटल सेतूच्या कठड्यावर चढून थेट समुद्रात उडी मारली. श्रीनिवास याला शोधण्यासाठी शोध पथकं रवाना झाली आहेत. या सगळ्या प्रकरणाचा न्हावा शेवा पोलीस अधिक तपास करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai