Breaking News
चर्चासत्रात सहभागी पत्रकारांनी घातला लोकशाहीचा जागर
नवी मुंबई : विधानसभा निवडणूक ही बंडखोरांचीच निवडणूक आहे. निवडणुकीत वाढत्या बंडखोरीमुळे नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. तर प्रत्येकालाच सत्तेची हाव सुटल्याने बंडखोरी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार बंडखोरीवर उतरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांनी सजग राहून आपले बहुमुल्य मत योग्य उमेदवाराच्या पारड्यात टाकून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन नवी मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सहभागी पत्रकारांनी केले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई प्रेस क्लबने नवी मुंबईतील पत्रकारंच्या नजरेतून बेलापूर, ऐरोली, पनवेल व उरण मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी शुक्रवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आघाडी, युती अन् बंडखोर किती या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करुन लोकशाहीचा जागर घातला होता. या चर्चासत्रामध्ये विविध प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत असलेले नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, प्रवीण पुरो, जयेश सामंत, विनय म्हात्रे, संजय सुर्वे, जगदीश तांडेल, स्वाती नाईक आदी सहभागी झाले होते. या पत्रकारांशी नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी संवाद साधला. निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या बंडखोरीची आता लोकांना सवय झाली आहे. या प्रकाराची जनतेमध्ये चीड आहे. त्यामुळे जनताच ठरवेल कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला नाही. नवी मुंबईत झालेली बंडखोरी ही निव्वळ पुनर्विकास प्रकल्पांचा मलिदा लाटण्यासाठी होत असलेल्या लॉबींगचा भाग असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर यांनी याप्रसंगी मांडले. तर बंडखोरी करणे ही महत्त्वाकांक्षी राजकारण्यांची गरज झाली असून गरजेपोटीच्या बंडखोरीमुळे राजकारणाचा विचका झाला असून नवी मुंबईतील चारही विधानसभा मतदारसंघामध्ये उभे असलेल्या उमेदवारांनी यापूव कधी ना कधी बंडखोरी करुनच निवडणुका लढविल्या आहेत. नवी मुंबईत घराणेशाही आणि प्रस्थापितांचे वर्चस्व असल्याने इतरांना वेगवेगळ्या कारणास्तव बंडखोरी करावी लागली असल्याचे पत्रकार जयेश सामंत यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना पत्रकार प्रवीण पुरो यांनी राजकारण फार खालच्या पातळीवर गेल्याचे नमूद करत देशामध्ये सर्वात विकृत राजकारण महाराष्ट्रात सुरु असल्याचे सांगितले. तसेच आपल्या राज्याचे मंत्रालय सर्वसामान्यांसाठी राहिल नसून पक्षाच्या आमदाराच्या किंवा जिल्हाध्यक्षांच्या चिठ्ठयांशिवाय मंत्री देखील काम करत नसल्याचे विदारक चित्र मंत्रालयात पहावयास मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता ही चालेल पण हुशार असा बंडखोरी करणारा माणूस आपल्याला कदापी नको हे आपण सर्वांनी ठरवून टाकलं पाहिजे असे प्रवीण पुरो यावेळी म्हणाले.
तर प्रस्थापित नेत्यांची मुले मोठी झाल्याने त्यांच्याही महत्त्वकांक्षा वाढल्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढविण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाने एका घरात एकच तिकिट देण्याचे धोरण अवलंबले असेल तर त्या घरातील दुसऱया इच्छुकाला बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मतदारांनी ठरवायचे आहे की बंडखोरांना निवडून द्यायचे की पक्षाच्या उमेदवाराला असे पत्रकार संजय सुर्वे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन-दोन पक्ष झाल्याने उमेदवारांना तिकिट मिळविण्यासाठी पर्याय तरी निर्माण झाले. त्यानंतरही एवढी बंडखोरी दिसून येत आहे. जर हे पक्ष फुटले नसते तर अजून किती मोठ्या प्रमाणात बंडखोरी आपल्याला दिसून आली असती. त्यामुळे कोणाला निवडून द्यावे असा प्रश्न मतदारांसमोर नक्कीच पडला आहे. काल एका पक्षात होता तो आज दुसऱ्या पक्षात आहे. त्यामुळे त्यांच्या निष्ठेवरच प्रश्न उपस्थित झाला आहे. पक्ष सोडताना मात्र आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणणारे अन्याय कोणत्या स्वरूपात झाला याबाबत चुप्पी साधताना दिसत असल्याचे संजय सुर्वे यांनी सांगितले.
वाढत्या बंडखोरीमुळे येणारा काळ निवडणुक आयोगासाठी किंवा देशासाठी कठीण काळ ठरणार आहे. उच्च शिक्षित तरुण-तरुणींनी राजकारणात यायला पाहिजे. कारण अजूनही राज्याच्या राजकारणात तेच तेच चेहरे दिसत आहेत. त्यामुळे लोकांना आता हा बदल अपेक्षित असून ते बदल करण्याच्या तयारीत असल्याचे पत्रकार विनय म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले. आज मतदान करण्यासाठी लोकांना सातत्याने आवाहन करावे लागत आहे. ही परिस्थिती न बदलल्यास भविष्यात आणखी काही महत्त्वाची पावले निवडणूक आयोगाला उचलावी लागण्याची शक्यता म्हात्रे यांनी व्यक्त केली.
सध्या काही राजकीय पक्ष हे प्रायव्हेट प्रॉपट झाल्याचे दिसून येते. आज कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलाय का? पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो. पक्ष ही प्रायव्हेट प्रॉपट नसते, हे अजूनपर्यंत मतदारांना उमगलेले नाही. जेव्हा उमगेल तेव्हा अशा प्रकारच्या या बंडखोऱया बंद होतील. आता या बंडखोरांना जर धडा शिकवायचा असेल तर तो सुज्ञ मतदारच शिकवू शकतील. कारण महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक राजकारण होतं त्याच्यामध्ये बंडखोरांना थारा नव्हता. आता जर बंडखोरांना सजा देणारे मतदार आणि कार्यकर्ते निर्माण झाले व कार्यकर्त्यांचे पक्ष मजबूत झाले तर वाढत्या बंडखोरीला निश्चितच आळा बसेल असा विश्वास पत्रकार जगदीश तांडेल यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
राज्यात कोणतेही सरकार आले तरी लाडकी बहिण वगैरे योजना नंतर बंद पडणार आहेत. विद्यमान सरकारला या योजनेचा थोडाफार फायदा होईल. परंतु, सुशिक्षित महिला मतदार या नक्कीच योग्य उमेदवाराला निवडून देतील असे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर त्याच त्याच आश्वासनांचा पाऊस पडलेला दिसतो. आश्वासने काय पुर्ण होताना दिसत नाहीत. निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची पेरणी जाणूनबुजून राज्यकर्त्यांकडून केली जात असल्याचे पत्रकार स्वाती नाईक यांनी याप्रसंगी नमूद केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai