Breaking News
पालिकेच्या कर्मचार्यानेच फोडले बिंग ; आयुक्तांची तक्रारीकडे पाठ
नवी मुंबई ः महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागात 1996 पासून 2021 पर्यंत कर आकारणीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीची प्रत ‘आजची नवी मुंबई’ च्या हाती लागली आहे. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी कमी कर आकारणी करुन पालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करत असल्याचे नमुद करुन त्यापोटी संबंधित व्यापार्याकडून 20 ते 30 टक्के रक्कमेची वसूली करत असल्याची तक्रार पालिकेच्या कर्मचार्यानेच केल्याने ऐन दिवाळीत धमाका झाला आहे. सदर तक्रार चार महिन्यापुर्वी प्राप्त होऊनही आयुक्त बांगर यांनी या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याने या ‘अभिजात’ वसूलीला बांगर यांचा आशिर्वाद आहे काय? असा सवाल विचारला जात आहे.
राज्यात जकातीला पर्याय म्हणून उपकर/स्थानिक संस्था कर आकारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. राज्यात स्थानिक संस्था कर लागू करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरली होती. महापालिका क्षेत्रात 37512 व्यापारी स्थानिक संस्था कर विभागात नोंदणीकृत असून त्यांच्याकडून पालिका 1996 पासून 2017 सालापर्यंत म्हणजेच वस्तू व सेवा कर लागू होईपर्यंत नियमित स्थानिक संस्था कर वसूल करत असे. स्थानिक संस्था कराचा दर सर्वसाधारणपणे 0.50 % ते 4 टक्क्यांपर्यंत तसेच उपकर 1 टक्क्यापर्यंत आकारण्यात येत असे. स्थानिक संस्था कराची वर्गवारी मुख्यता औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, घाऊक व किरकोळ व्यापारी वर्ग, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, नोंदणी फी व उपप्रादेशिक कार्यालयाकडून वाहन नोंदणीधारक अशा माध्यमातून उपकर/स्थानिक संस्था कर गोळा करण्यात येत होता. 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर लागू होण्यापुर्वी स्थानिक संस्था कर माध्यमातून पालिकेला सुमारे 650 कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत होते. आता त्याच्या नुकसानीपोटी महाराष्ट्र शासनाकडून दरमहा 107.60 कोटी रुपये अनुदानाच्या माध्यमातून प्राप्त होत आहेत.
वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर सूमारे लाखाहून अधिक कर आकारणी आणि कर परताव्याची प्रकरणे उपकर विभागाकडे प्रलंबित असून व्यापार्यांची कर निर्धारणा करुन त्यांना नियमबाह्य कर परतावा देण्याचे काम सुरु असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. गेल्या वीस वर्षापासून सदर विभागात राजेंद्र चौगुले आणि सुखदेव येडवे हे अधिकारी ही कामे करत असून त्यांच्यामार्फत व्यापार्यांकडून करनिर्धारण केल्यानंतर वसूलीची रक्कम वरिष्ठ अधिकार्यांना देत असल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. आपण संबंधित अधिकार्यांच्या भ्रष्टाचारात सामील न झाल्याने आपल्यावर विनयभंगाची खोटी तक्रार नोंदवून आपली बदली करण्यात आल्याचे सांगत विशाखा समितीने सदर तक्रार खोटी असल्याचा निकाल दिल्यावरही आपल्याला पुन्हा या विभागात काम देण्यात आले नसल्याचे संबंधित तक्रारीत नमुद केले आहे. या तक्रारीत पालिकेच्या उपकर आणि स्थानिक संस्था कर विभागात सूमारे हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आयुक्त बांगर यांना कळविले असून निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत पालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही. त्याचबरोबर उपायुक्त प्रशासन यांनी याबाबत तक्रार प्राप्त झाली असून उपायुक्तांमार्फत चौकशी करण्यासाठी नस्ती आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, गेले चार महिने या तक्रारीवर कोणतीही कारवाई न करणार्या आयुक्तांच्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे