Breaking News
नरेंद्र पाटील यांची नाराजी ; शिवसेनेला करणार ‘जय महाराष्ट्र’
नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडविलेले नसल्याची खंत माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. तसेच याविषयी मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याची टिका करुन अखेर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं.
नरेंद्र पाटील यांनी लोकसभेची निवडणूक सातारा मतदार संघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती आज माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली आहे. एपीएमसी येथील माथाडी भवन येथे माथाडी नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 39 व्या पुण्यातिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी नाराजी ठाकरे सरकारविषयी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार येवून दीड वर्ष होत आले, तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडविलेले नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बैठकीबाबत वेळ मागूनही ते भेटत नाहीत. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलं.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी शिवसेनेत राहू नये अशीच पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याने आपण नाईलाजास्तव शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी शिकांत शिंदे यांनी माथाडी चळवळ उभी करणे काळाची गरज असल्याचे सांगत या कामगारांचे सर्व प्रश्न राज्य सरकारमार्फत सोडवण्याचे आश्वासन दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai