Breaking News
संदीप नाईक यांचा विरोध; घरे फ्री होल्ड करण्याची मागणी
नवी मुंबई ः सिडकोने नव्याने बदल केलेल्या नियमानुसार निवासी मालमत्तेच्या हस्तांतर शुल्कात 5 ते 10 टक्के व व्यावसायिक गाळयांच्या हस्तांतर शुल्कात तब्बल 50 टक्क्यांनी शुल्क वाढ केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या निर्णायास माजी आमदार संदीप नाईक यांनी विरोध केला आहे. शासनाने सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात केलेली दरवाढ त्वरित रद्द करुन घरे फ्री होल्ड करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे शासनाला केली आहे.
नवी मुंबईतील सर्व मालमत्ता सिडकोच्या मालकीच्या आहेत. विविध प्रयोजनासाठी सिडकोने त्या 60 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्या आहेत, त्यामुळे या मालमत्ता विकताना सिडको संबंधितांकडून हस्तांतर शुल्क आकारते. मात्र, हे शुल्क रद्द करून जमिनी फ्री होल्ड करण्याची मागणी सातत्याने होत असतानाच, सिडकोच्या घरांवरील लिज फ्री होल्ड करण्याचा निर्णय ऑक्टोंबर 2024 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी सिडकोने हस्तांतरण शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सिडकोने निवासी मालमत्तेच्या हस्तांतर शुल्कात 5 ते 10 टक्के तर, व्यावसायिक गाळयांच्या हस्तांतर शुल्कात तब्बल 50 टक्क्यांनी शुल्क वाढ केली आहे. 1 एप्रिल 2025 पासून हे नवे बदल लागू करण्यात आले असून दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, जुुईनगर, नेरुळ, सीबीडी-बेलापूर येथील मालमत्ता विषयक व्यवहारांमध्ये हे वाढीव दर लागू होणार आहेत. सदर बदलानंतर निवासी मालमत्ता व व्यावसायिक मालमत्ता हस्तांतरणासाठीची जाचक रक्कम सामान्य नागरिकांना परवडणारी नाही. याचा थेट परिणाम मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारांवर दिसेल. या जाचक शुल्क वाढी विरोधात सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
सिडकोच्या घरांंवरील लिज फ्री होल्ड करण्याचा निर्णय ऑक्टोंबर 2024 च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. सदर ठरावाच्या अनुषंगाने शासनाने सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात केलेली दरवाढ त्वरित रद्द करुन घरे फ्री होल्ड करण्यात यावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत असून त्या अनुषंगाने सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा. यासंदर्भात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तसेच नगर विकास विभाग आणि सिडको महामंडळाला दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी पत्र पाठवून मागणी केलेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai