Breaking News
नवी मुंबई ः दिव्यांग कल्याणकारी अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून इटीसी केंद्राने नेहमीच दिव्यांगाना आधार दिलेला आहे. या अनुषंगाने इटीसी केंद्राच्या माध्यमातून पालिका मुख्यालय इमारतीत आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग विद्यार्थी, व्यक्ती व त्यांचे पालक यांनी बनविलेल्या विविध दिवाळी साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन' मार्फत दिवाळी उत्सवाच्या कालावधीत ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहीम राबविण्याचे सूचित करण्यात आले असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने इतर विभागांच्या सहयोगातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देणारा तसेच ‘थ्री आर' च्या अनुषंगाने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मितीला प्राधान्य देणारा हा दिव्यांगामार्फत दिवे, आकाशकंदील व इतर दिवाळी साहित्य निर्मितीचा अभिनव उपक्रम अत्यंत आगळावेगळा आहे. या वस्तूंच्या महापालिका मुख्यालयातील प्रदर्शनास आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भेट देत या दिव्यांग मुलांचे, व्यक्तींचे तसेच त्यांच्या पालकांचे उत्तम कलाकृती निर्मितीबद्दल कौतुक केले.
या दोन दिवसीय दिव्यांग व त्यांच्या पालकांनी निर्माण केलेल्या दिवाळी वस्तू प्रदर्शनाला नमुंमपा अधिकारी, कर्मचारी व महापालिका मुख्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनी भेट देऊन वस्तू खरेदी करून त्यांचा उत्साह वाढविला. ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत ‘थ्री आर'च्या अनुषंगाने ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहीमेतही एका चांगल्या दिव्यांग कल्याणकारी उपक्रमाची नोंद झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai