Breaking News
अहमदाबाद ः केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर घातलेल्या निर्बंधाचा परिणाम फक्त शेतकर्यांवर नव्हे तर मालवाहतूक करणार्यांवरही होत आहे. शिपींग आणि मालवाहतूकदारांचं मोठं नुकसान होत आहे. गुजरातच्या कांडला-गांधीधाम इथल्या मालवाहतूकदारांचं दररोज तीन कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. निर्यात बंदीमुळे गव्हाची वाहतूक करणारे पाच हजारांहून अधिक ट्रक अडकले आहेत.
‘गांधीधाम गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन’चे सचिव सतवीर सिंह लोहान यांनी सांगितलं की निर्यातीसाठी पाठवण्यात आलेला गहू ट्रकमध्येच अडकला आहे. जवळपास पाच ते सहा हजार ट्रक कांडला बंदराबाहेर उभे आहेत. यामुळे ट्रक मालकांचं कमीत कमी तीन कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. निर्यातदारांनी मालवाहतूकदारांचे फोन घेणं बंद केलं असून कोणताही संपर्क होत नाही. निर्यातदारांशी संपर्क होत नसल्याने मालवाहतूकदारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, कांडला बंदर प्राधिकरणाने सात मालवाहू जहाजांना जेट्टी सोडून खोल समुद्रात जाण्यास सांगितलं आहे.‘जीएस इन्फ्रा पोर्ट’चे सीमा शुल्क ब्रोकर राकेश गुर्जर यांनी बंदराबाहेर असलेल्या ट्रकमध्ये जवळपास अडीच ते तीन लाख टन गहू अडकला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गोदामातल्या साठ्याचा विचार करता बंदरावर 15 ते 20 लाख टन गहू दाखल होऊ शकतो. केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीसंदर्भात आता काहीशी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. 13 मे पर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केलेला गव्हाचा साठा पुढे पाठवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 13 मे किंवा त्यापूर्वी सीमा शुक्ल विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेला गहू देशाबाहेर पाठवण्यात येणार आहे. तसंच इजिप्तच्या मार्गावर असलेला गव्हाचा साठाही पुढे पाठवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे गहू निर्यातदारांना मोठा दिलासा मिळला आहे.
देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारात वाढलेल्या गव्हाच्या किंमतीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. युक्रेन-रशिया युद्ध आणि कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे देशात गव्हाचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचं सरकारने म्हटलं. त्यामुळे देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने निर्यात बंदी लागू केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai