Breaking News
मुंबई : राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आदी शाळांचा मूलभूत गुणवत्तापूर्ण विकास करण्याबरोबरच त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवून उच्च दर्जाचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी पंतप्रधान स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएम श्री) योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यातील 846 पैकी 516 शाळांची निवड करून त्याला अंतिम मंजुरी दिली आहे. उर्वरित शाळांनाही दुसऱ्या टप्प्यात मंजुरी मिळणार असून त्या शाळाही विकसित करण्यात येणार आहेत.
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली जात आहे. त्यातच 516 सरकारी शाळाही ‘पीएमश्री'मध्ये विकसित केल्या जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारचा 60 टक्के आणि राज्याचा 40 टक्के निधी खर्च केला जाणार आहे. प्रत्येक शाळेसाठी सुमारे 1 कोटी 80 लाख इतका निधी खर्च केला जाणार आहे. या शाळांमध्ये प्रामुख्याने आदर्श, मॉडर्न शाळा आणि केंद्रीय विद्यालयाच्या शाळांच्या धर्तीवर शैक्षणिक विकासाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
मागील काही महिन्यांपासून या शाळांच्या विकासासाठी प्राथमिक शिक्षण परिषद, समग्र शिक्षा अभियान, शिक्षण संचालक आदी विभागांकडून नियोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर यूडायस आणि शाळांची पटसंख्या, शिक्षकांची उपलब्ध संख्या आदींची शिक्षण विभागाकडून माहिती घेऊन, 846 शाळांची निवड करून त्याची यादी केंद्राकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 516 शाळा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निवडून त्यांना मंजुरी दिली आहे
केंद्र सरकारकडे आम्ही पाठवलेल्या 846 पैकी सध्या 516 शाळांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. उर्वरित शाळांनाही लवकरच मिळेल. आम्ही प्रत्येक शाळेसाठी 1 कोटी 80 लाख रुपये खर्च करणार आहोत. दुसरीकडे 488 आदर्श शाळा प्रस्तावित असून त्यातील 448 शाळांना मान्यता दिली आहे. त्यासाठी 479 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. - दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
पीएम श्री योजनेची उद्दिष्टे
सरकारने केलेली तरतूद
‘पीएम'श्री योजनेत राज्याच्या हिश्श्यापोटी 91 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 2022-23 मध्ये आदर्श शाळांसाठी 479 कोटींची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी 254 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. पुढील वर्षी मोठ्या बांधकामांसाठी प्राथमिक शाळांना 199.40 कोटी; तर माध्यमिकसाठी 56.12 कोटी इतका निधी ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समग्र शिक्षाअंतर्गत पायाभूत सुविधांसाठी 86 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या वर्षात 1351 आयसीटी लॅब, 2040 डिजिटल लायब्ररी; 10,594 स्मार्ट क्लासरूम्स, शिक्षकांसाठी 97,249 टॅबलेट्स, 105 स्टेम लॅब, 533 टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत.
शाळांची जिल्हानिहाय संख्या
अकोला- 11, अमरावती- 18, औरंगाबाद- 11, बीड- 13, भंडारा- 12, गोंदिया- 13, हिंगोली- 5, जळगाव- 18, लातूर- 13, नागपूर- 21, नांदेड- 18, नंदुरबार- 8, पालघर- 11, परभणी- 11, बुलडाणा- 22, चंद्रपूर- 18, उस्मानाबाद- 9, नगर- 21, गडचिरोली- 16, कोल्हापूर- 18, नाशिक-26, पुणे- 23, रायगड- 20, रत्नागिरी- 13, सांगली- 14, सातारा- 18, सिंधुदुर्ग- 13, सोलापूर- 23, ठाणे- 14, वर्धा- 13, वाशिम- 7, यवतमाळ- 26, धुळे- 7, जालना जिल्ह्यातील 12 शाळांना ‘पीएमश्री' योजनेअंतर्गत मान्यता मिळाली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai