Breaking News
नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई ः राज्यात सुरू असलेल्या राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे. त्यासोबतच सानुग्रह अनुदान देखील कुटुंबियांना मिळणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला जुन्या पेन्शन योजनेचे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून राज्यातील शासकीय आणि निम-शासकीय कर्मचारी, शिक्षक-कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारने पेन्शन योजनेचा आढावा घेण्यासाठी तीन सदस्यीय समितीची घोषणा केली आहे. गुरुवारी अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी कॅबिनेट बैठक पार पडली. 'एकच मिशन, जुनी पेन्शन' या घोषणा देत राज्यातील शासकीय कर्मचारी सध्या रस्त्यावर उतरला आहे. 2005 नंतर जे शासकीय सेवेत आले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना सरकारने लागू करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्यातील सुमारे 17 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी संपकऱ्यांची आहे. संपूर्ण राज्यातभरात कर्मचारी संपावर गेल्यामुळे अनेक कामे ठप्प पडली आहेत. दुसरीकडे आता नव्या पेन्शन योजनेत बदल करुन राज्य सरकाराने कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे. 2005 पासून ते आजपर्यंत म्हणजेच मागील 17 वर्षात 2500 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनाहे कुटुंब-निवृत्ती वेतन मिळत नव्हते. या आधी 10 लाखांचा सानुग्रह अनुदान मिळत होत. त्यात आता बदल करण्यात आला आहे. तर, निवृत्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा उपदान ही मिळणार आहे. नवीन पेन्शनधारकांना या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यासोबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतही कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय झाला आहे. यासोबतच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai