Breaking News
वाहतूक पोलिसांची महापालिका प्रशासनाकडे मागणी
नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच मार्गावर विविध उपाय योजना करूनही अपघात सत्र सुरूच असल्याने वाहतूक पोलिसांनी गतिरोधक अशक्य असल्यास किमान रम्बलर तरी बसवा अशी मागणी पालिकेकडे केली आहे. दरम्यान या संदर्भात वाहतूक पोलीस व पालिका प्रशासन एक संयुक्त बैठक घेऊन याबाबत ठोस निर्णय घेणार आहेत.
गेल्या आठवड्यात पामबीच मार्गावर भरधाव वेगाने तिघांचा बळी घेतला. यापूर्वीही असे अनेक अपघात झाले असून हे अपघात सत्र सुरूच आहे. या मार्गावर वेगमर्यादा ही 60 किमोमीटर प्रतितास इतकी आहे. असे असताना या वेगमर्यादेचे पालन होताना दिसत नाही. रात्रीच्या वेळी तर शंभरपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवली जातात. त्यामुळे वाहनावरचा ताबा सुटून या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. या ठिकाणी स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांचा वेग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र वाहनचालक स्पीड गनच्या टप्प्यात वाहनांचा वेग कमी करतात असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गतिरोधक बसवण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र महामार्ग असल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार तेथे गतिरोधक बसवता येत नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. बुधवारच्या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी गतिरोधक शक्य नसतील तर किमान अपघात होत असलेल्या ठिकाणी रम्बलर तरी बसवा अशी मागणी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai