Breaking News
मतांच्या जोगव्यासाठी नाईक-आव्हाड यांचा उड्डाणपुलाला विरोध
नवी मुंबई ः पामबीच मार्गावर महात्मा फुले जंक्शन ते कोपरी सिग्नलपर्यंत उड्डाणपुल बांधण्याच्या निर्णयाला नवी मुंबईतून जोरदार विरोध होत आहे. पालिका निवडणुकीत या नाराजीचा फटका बसू नये म्हणून गणेश नाईक व जितेंद्र आव्हाड यांनी या उड्डाणपुलाला विरोध दर्शविला आहे. परंतु, हा उड्डाणपुल व्हावा म्हणून ‘विपुल’ हट्ट धरणार्या ‘ठाणेदारा’च्या या निर्णयाचा फटका शिवसेनेला बसणार असल्याने नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने 361 कोटी रुपये खर्च करुन वाशीत महात्मा फुले जंक्शन ते कोपरी सिग्नलपर्यंत उड्डाणपुल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. हा चार पदरी पुल असून त्यामुळे पामबीच मार्गावरील अरेंजा जंक्शनवर वाहनांच्या होणार्या कोंडीतून नवी मुंबईकरांना मुक्तता मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुलासाठी 6 झाडे तोडण्यात येणार असून 384 झाडांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. ही जाहीरात प्रसिद्ध होताच नवी मुंबईकरांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या पुलाची आवश्यकता नसताना त्याचे काम हाती घेतल्यामुळे आधीच नाराज असणारे नवी मुंबईकर या वृक्षतोडीमुळे कमालीचे संतापले आहेत. पर्यावरणप्रेमी आणि काही सामाजिक संघटनांनी याबाबत आवाज उठवला असून राज्याच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार केली आहे. नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त करुनही स्थानिक आमदारांनी कोणतीच भुमिका न घेतल्याने विरोधाचा सूर उमटू लागला होता.
या पुलाला होत असलेला विरोध बघुन राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्वप्रथम त्यास विरोध दर्शवून हे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली. इतका वेळ ‘न रोवा कुंज रोवा’ ही भुमिका घेतलेल्या गणेश नाईकांनी तातडीने पालिका आयुक्त यांना पत्र देऊन सदर काम रद्द करण्याची मागणी केली आहे. नाईक यांच्या पत्रातील मजकूर मोघम असल्याने त्यांना हा उड्डाणपुल रद्द व्हावा असे खरोखरच वाटते का? अशी चर्चा नवी मुंबईत आहे. दरम्यान, नवी मुंबईत या पुलाविरोधात जनमत तयार होत असताना शिवसेनेने कोणतीही भुमिका न घेतल्याने येत्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक जनतेच्या नाराजीचा फटका सेनेला बसू शकतो या चिंतेने नवी मुंबईतील शिवसैनिकांत अस्वस्थता पसरली आहे. सेनेचे अनेक नेते खाजगीत या पुलाला विरोध करत असून ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधेल’ म्हणून गप्प आहेत. गेली पाच वर्ष मेहनतीने जमा केलेला जनाधार ठाणेदाराच्या विपुल हट्टापोटी गमवण्याची भिती शिवसैनिकांना वाटत आहे.
साधक-बाधक चर्चेचा अर्थ काय?
आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वास्तविक पाहता, ज्या आयुक्तांनी हा प्रस्ताव मंजुर केला त्यांच्याकडून चौकशीची अपेक्षा करणे हे राजकारणात 50 वर्ष कार्यरत असलेल्या नाईकांना कळू नये याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात येऊन सर्वसाधारण सभेमध्ये साधक-बाधक चर्चा होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत काम रद्द करण्याची मागणी त्यांनी केल्याने हे काम खरोखरच रद्द व्हावे अशी नाईकांची मनिषा आहे काय? असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे. त्यामुळे साधक-बाधक चर्चेच्या अर्थाच्याही प्रतिक्षेत नवी मुंबईकर आहेत.
वाहतुक कोंडीला पालिका जबाबदार
नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागाने पामबीच मार्गावरील अरेंजा जंक्शन ते कोपरी जंक्शनपर्यंत दिलेल्या बांधकाम परवानग्यांमुळे वाहतुक कोंडी होत असल्याचे बोलले जात आहे. सिडकोने या रस्त्याचे नियोजन करताना या मार्गावर एकही प्रवेशमार्ग प्रस्तावित केला नव्हता तसेच या मार्गालगतच्या भुखंडांना प्रवेश मागील रस्त्यावरुन दिला होता. परंतु, पालिकेने पामबीच मार्गावर दुकानांना मंजुरी दिल्याने वाहने पार्किंगची समस्या वाढल्याने वाहतुक कोंडी होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे