Breaking News
मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाअंतर्गत (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) मुंबई आणि नवी मुंबई शहराची जोडणी आता पूर्ण झाली असून पुढील काम पूर्ण करत डिसेंबरमध्ये हा सागरी सेतू वाहतुकीस खुला होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर दीड-दोन तासाऐवजी केवळ 20 मिनिटांत पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हा सागरी सेतू म्हणजे केवळ सागरी सेतू नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा मार्ग असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुंबई आणि नवी मुंबई शहरांना थेट जोडत या दोन्ही शहरांतील प्रवासाचे अंतर दीड ते दोन तासांऐवजी केवळ 20 ते 22 मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई पारबंदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 2019 पासून या प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे. मागील दोन वर्षांत या प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला वेग देत नोव्हेंबर 2023 मध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या मुंबई शहर (शिवडी) आणि नवी मुंबई (शिवाजीनगर) दोन्हींना जोडणाऱ्या 22 किमीच्या संपूर्ण सागरी सेतूचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचा आढावा बुधवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतला. अंत्यत कठीण आणि आव्हानात्मक काम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे कौतुक केले.
या प्रकल्पामुळे मुंबईवरून नवी मुंबईच नव्हे तर पुढे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाणेही सोपे होणार आहे, कारण हा सेतू द्रुतगती मार्गाशी जोडला जाणार आहे. तसेच नवी मुंबई विमानतळ, जेएनपीएलाही वेगाने जाता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भविष्यात अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिकेशीही सागरी सेतू जोडला जाणार असल्याने हा प्रकल्प सामाजिक-आर्थिक विकास साधणारा प्रकल्प ठरणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तर समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई पारबंदर प्रकल्पही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाचा शुभारंभ केलेला आणि त्यांच्याच हस्ते लोकार्पण होणारा प्रकल्प असणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या प्रकल्पात पर्यावरणाला कुठेही धक्का पोहचविण्यात आलेला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या सागरी सेतूसाठी 85000 मे. टन ऑर्थोट्रॉपिक स्टील वापरण्यात आले आहे. 747 विमानांइतके हे स्टील आहे. तर पृथ्वीला चार प्रदक्षिणा होतील इतक्या प्रिस्ट्रेसिंग वायरचा वापर करण्यात आल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा प्रकल्प असणार असल्याचे म्हणत त्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.
सागरी सेतू प्रकल्पामुळे काय फायदा होणार?
1) नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे
2) प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. त्याशिवाय, मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट यांचे दरम्यान वेगवान दळणवळण शक्य होणार आहे.
3) मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे 15 किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत होणार आहे.
4) मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai