Breaking News
उरण : सध्या अनेक ठिकाणी माती, कचरा आणि राडारोडा टाकून खारफुटी मारली जात आहे. याकडे सिडको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवाद्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबईसाठी उरण पनवेल आणि नवी मुंबईतील ज्या बेलापूर पट्टीतील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत त्यासर्व जमिनी या समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील आहेत. येथील जैवविविधता आणि समुद्राच्या नैसर्गिक पाणी निचऱ्याची व्यवस्था ही खारफुटीच्या सहजीवनाची आहे. मात्र विकासाच्या नावाखाली येथील नैसर्गिक प्रवाह बंद किंवा बुजवून त्याठिकाणी मातीचा भराव करण्यात आला आहे. परिणामी अनेक ठिकाणी खारफुटीत घट झाली आहे. मात्र खारफुटी ही समुद्राच्या लाटा आणि त्सुनामीसारख्या प्रकोपाच्या वेळी होणारी किनाऱ्याची धूप थांबवून किनारपट्टीवर जीव, जंतू प्राणी यांच्या सुरक्षेची महत्वाची भिंत आहे. त्याचे संवर्धन आणि संरक्षण ही मूळ कामगिरी खारफुटी करीत आहे. मात्र हीच नष्ट केली जात आहे. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे.
यासाठी पर्यावरणवाद्यांनी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. तसेच आंदोलनेही केली आहेत. त्यासाठी न्यायालयातही भूमिका मांडली आहे. नवी मुंबई नंतर झपाट्याने विकसित होत असलेल्या उलवे नोडमधील सेक्टर 2 मधील काही ठिकाणी अशा प्रकारचा मातीचा भराव येथील खारफुटीवर टाकण्यात येत आहे. राडारोडा आणि कचऱ्याच्या भरावामुळे प्रदूषण निर्माण होत आहे. खारफुटीच्या संवर्धनासाठी अनेक उपाययोजना केंद्र आणि राज्य सरकारने आखल्या आहेत. याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासन, वन विभाग यांची आहे. मात्र याकडे या विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai