Breaking News
मुख्यमंत्री फडणवीस यांची मेळाव्यात ग्वाही
नवी मुंबई : राज्यात मराठा समाजाचा विचार करत असताना समाजातील इतर घटकांवर कुठलाही अन्याय होणार नाही असाच आमचा आजवरचा प्रयत्न राहिला आहे. मराठा समाजाला सोबत घेत असताना ओबीसी, मायक्रो ओबीसी, भटके विमुक्त आहेत त्यांच्यावर कुठलाच अन्याय होणार नाही. असे जर आम्ही वागलो तरच छत्रपतींचा वारसा आम्ही सांगू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वाशी येथे केले. नियमांनुसार माथाडी कामगारांना जे काही देता येईल ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जाईल, अशी ग्वाहीही यावेळी फडणवीस यांनी दिली.
माथाडी कामगारांचे नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमीत्त वाशी येथील एपीएमसी बाजारात आयोजित करण्यात आलेल्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वन मंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच आमदार शशिकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, खासदार अजित गोपछडे, आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार कुमार आयलानी, आमदार विक्रांत पाटील, आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मराठा समाजाच्या सक्षमीकरणासाठी काम करताना इतरांवर अन्याय होणार नाही असेच काम आपण करत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांचे मावळे हे मराठा होते, ते ओबीसी होते, ते अठरा पगड जातीचे लोक होते. ते बारा बलुतेदार, अलुतेदार होते. हे सगळे एकत्रित राहिले तर छत्रपतींचा वारसा आपण सांगू शकू. तर आपण म्हणू शकू की छत्रपतींच्या पावलावर माझा महाराष्ट्र चाललेला आहे आणि म्हणून समाजाला एकमेकांसमोर आणून समाजात समाजामध्ये दुही निर्माण करणं. त्यांच्यामध्ये भांडण निर्माण करणं हे कधीच आम्ही होऊ देणार नाही. हे आम्ही होऊ दिलेही नाही आणि यापुढेही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार हाच आमचा विचार या ठिकाणी असणार आहे. आणि हीच शिकवण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेली आहे.
आपल्या संपूर्ण घर संसार परिवार हा एखादी व्यवस्था उभी करण्याकरता कुर्बान करून टाकायचा अशा प्रकारची भावना असणारे नेते हे आपल्याला इतिहासामध्ये फार कमी आढळतात आणि त्यापैकी एक नाव हे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचं होतं. ज्यांनी माथाडी समाजाकरता एक मोठं संघटन उभा केलं आणि हा जो सामान्य कामगार जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात ना सातारा जिल्ह्यातलं आसपासच्या जिल्ह्यातलं या ठिकाणी मुंबईमध्ये आला होता या कामगाराला स्थैर्य मिळाला पाहिजे. आपल्या पाठीवर ओझं उचलणारा आणि त्याची सातत्याने पिळवणूक होत होती. त्याला कदाचित मानवाचे जीवन देखील योग्य प्रकारे मिळत नव्हतं अशा कामगाराचा आवाज म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी ही चळवळ हातामध्ये घेतली आणि त्यांनी या चळवळीला एक संघटित स्वरूप दिलं. त्या स्वरूपाचा परिणाम आहे की आज महाराष्ट्रातली माथाडी चळवळ याची पाळामुळे इतकी खालपर्यंत गेली. या चळवळीला कोणी थांबवू शकत नाही या चळवळीला कोणी बंदिस्त करू शकत नाही आणि हा जो माथाडीचा कायदा आहे हा कायदा आणि चळवळ अजरामर करणारी अशा प्रकारची संघटना ही या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी उभी केली. त्या गरीब माथाडी कामगाराला आवाज मिळाला त्याला सुरक्षा मिळाली त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना स्वप्न पाहण्याचा अधिकार हा अण्णासाहेबांनी दिला आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या संख्येने त्यांच्या 92 व्या जयंतीला आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत.
माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या चौकटीत राहून जे करणे आवश्यक आहे ते आम्ही निश्चित करू. नियमांनुसार माथाडी कामगारांना जे काही देता येईल ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जाईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाज आणि माथाडी कामगारांसाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी आभार मानले. त्यांनी माथाडी कामगारांच्या निवासासाठी स्वस्त दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून दीड लाख उद्योजक निर्माण करता आले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai