Breaking News
उरण : रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील 124 गावांतील विशेष प्राधिकरण म्हणून केलेल्या एमएमआरडीएच्या नियुक्तीला विरोध होत असून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती दाखल झाल्या आहेत. 4 एप्रिलपर्यंत हरकती व सूचनांसाठी मुदत दिली होती. आता 7 एप्रिलपर्यंत लेखी हरकती नोंदविता येणार असल्याची माहिती कोकण विभागाच्या नगररचना सहसंचालकांनी दिली आहे.
विविध गावांतील जमिनीच्या परिसरांच्या विकासाची जबाबदारी शासनाने सिडकोऐवजी एमएमआरडीएला दिली आहे. यासंदर्भात 7 एप्रिलपर्यंत शेतकरी आणि लाभधारक यांच्या हरकती नोंदविल्या जाणार आहेत. राज्य सरकारने 4 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांतील 124 गावांसाठी नवनगर विकास प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नेमणूक केली आहे.
याबाबत एमएमआरडीए विरोधी शेतकरी संघर्ष समिती (नियोजित) यांच्या माध्यमातून संबंधित गावात गावबैठका, विभागीय बैठकांचे आयोजन करत शेतकऱ्यांत जनजागृती करण्यात आली. त्यानुसार सहसंचालक नगर रचना, कोकण विभाग, तिसरा मजला येथे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी जमून या हरकती नोंदविल्या. याशिवाय ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेद्वारे घेतलेले विरोधाचे ठराव दाखल करण्यात येणार आहेत. शासनाने सागरी अटलसेतूच्या मजबुतीकरणासाठी पुलालगतच्या परिसराच्या विकास करण्याची योजना आखली आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील 124 गावांतील 324 हेक्टर परिसरांतील जमिनींचे नियोजन करण्यात येणार आहे. या जमिनी विकसित करण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यासाठी संघटना बांधणी सुरू आहे. 7 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवू शकतात. त्यानंतर सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागाचे नगररचना सहसंचालक जितेंद्र भोपळे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai