Breaking News
मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा जोरदार पावसाळा सुरुवात झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली होती. त्यानुसार सोमवार संध्याकाळपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतेक भागात पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील एकूण 16 जिल्ह्यांसह मुंबई आणि पुणे शहरांतही हंगामातील पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी पडला. त्यामुळे पाणीसाठ्याबाबत अद्यापही चिंता कायम असून, आठवड्यापासून पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. राज्यातील सर्व धरणांत मिळून गेल्यावर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, अनेक भागांत पाऊसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी तरी हंगामातील पावसाची सरासरी पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांत काही भागांत या दोन दिवसांत मुसळधारांची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पुढील 2-3 दिवस ठाणे जिल्ह्यांसाह महाराष्ट्रच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai