Breaking News
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पहिल्या नंबरचा बहुमान पटकाविण्यासाठी जोरदार तयारी केली असून आता सर्वेक्षणाच्या अखेरच्या टप्प्यात स्वच्छतेकडे अधिक काटेकोरपणे लक्ष केंद्रीत करावे असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष बैठकीप्रसंगी दिले.
शहर सुशोभिकरणामध्ये नजरेत भरेल अशाप्रकारे उत्तम काम झाले असून नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणावर पसंतीचे अभिप्राय प्राप्त झालेले आहेत. अशाचप्रकारे दैनदिन स्वच्छतेकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देऊन हागणदारीमुक्त डबल प्लस मानांकनाच्या पुढे जात वॉटरप्लस मानांकन प्राप्त करणे, कचरामुक्त शहराचे सेव्हन स्टार रेटींग मिळविणे व स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात पहिल्या क्रमांकाचा बहुमान प्राप्त करणे हे आपले उद्दिष्ट असून त्याकरिता यापुढील काळात अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. शहरातील नाल्यांच्या स्वच्छतेवर अधिक भर देत असताना नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये याकरिता लावण्यात येणार्या जाळ्यांचे प्रमाण वाढवावे असे सूचित करीत आयुक्तांनी नाल्यांच्या प्रवाहामध्ये लावण्यात येणार्या स्क्रिनमध्ये अडला जाणारा कचरा नियमीत साफ करण्याचे नियोजन करावे असे निर्देश दिले. शहरात प्रतिबंधीत प्लास्टिक दिसताच कामा नये ही भूमिका स्पष्टपणे विषद करीत आयुक्तांनी प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया किती झाल्या व त्यामधून किती दंडात्मक रक्कम वसूल झाली यापेक्षा प्लास्टिकचा वापरच केला जात नाही हे आपले लक्ष्य असल्याचे सांगितले. दुकानदार, फेरिवाले या कोणाकडेही प्लास्टिक पिशव्या दिसताच कामा नये याकरिता कारवायांची संख्या वाढविण्याबरोबरच याबाबतच्या धडक कारवाईकरिता 4 दिवसांचा कालावधी सहाय्यक आयु्क्त तथा विभाग अधिकारी यांना देऊन याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले. पोलीसांसह नियुक्त केलेल्या वॉर्डनिहाय दक्षता पथकांमार्फत कारवाई करताना प्लास्टिक प्रतिबंधाप्रमाणेच कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणारी मास्क व सुरक्षित अंतर याबाबतची कार्यवाही संयुक्तपणे करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत केंद्रीय पथकाच्या पाहणीपूर्वी नोडल अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आलेल्या पूर्व पाहणीचा आढावा यावेळी घेण्यात आला व त्यामध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्परतेने निराकरण करण्यात यावे असे निर्देश देत स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतिम टप्प्प्यात स्वच्छतेविषयी कोणतीही हयगय चालवून घेतली जाणार नाही असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई शहराला देशात पहिला नंबर मिळवून देण्यासाठी नागरिकांनी घरीच कचर्याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण करणे, महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्ये तो वेगवेगळा देणे तसेच घरात निर्माण होणार्या ओल्या कचर्याचे कंपोस्ट बास्केट वापरून घरातच खतात रुपांतर करणे या गोष्टी दैनंदिन जीवनात सवयीच्या बनवाव्यात. आपल्या शहराविषयी केंद्र सरकारमार्फत विचारल्या जाणार्या प्रश्नांना नंबर वन उत्तरे देऊन देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त करून देण्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai