Breaking News
नवी मुंबई ः भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी प्रत्येक काम वैशिष्ट्यपूर्ण रितीने केले त्यामुळे त्यांच्या जयंती दिन हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला केलेले अभिवादन असून यामधून आपण करीत असलेले काम नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे ही त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल असे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागाच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनानिमित्त ’अभियंता दिन’ समारंभाचे आयोजन करम्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, समारंभाचे प्रमुख वक्ते व माजी शहर अभियंता मोहन डगांवकर, माजी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व शिरीष आरदवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने आजवर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकीक सर्वत्र असून नवी मुंबई ही नाविन्यपूर्ण व गुणवत्तेला प्राधान्य देणारी महानगरपालिका असल्याचे सांगत आयुक्तांनी हा लौकीक वाढविण्यासाठी अधिक चांगले काम करण्यासाठी कटिबध्द राहण्याची आवश्यकता व्यक्त केली. याकरिता प्रत्येकाने आपण करीत असलेले काम अधिक नाविन्यपूर्ण रितीने करण्याची सवय लावून घ्यावी व केलेल्या उल्लेखनीय कामाने आत्मसंतुष्ट न होता नवे काम करताना सतत अद्ययावत रहावे असे ते म्हणाले. याप्रसंगी बोलताना शहर अभियंता संजय देसाई यांनी 1992 साली 50 लाख अंदाजपत्रकीय तरतूदीपासून 29 वर्षात 2100 कोटी रक्कमेच्या अंदाजपत्रकीय तरतूदीपर्यंतच्या अभियांत्रिकी विभागाच्या वाटचालीत स्थापत्य, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा सर्वच सेवासुविधांमध्ये गुणात्मक दर्जा राखल्याने नवी मुंबई शहर आज देशातील मानांकित शहरांमध्ये गणले जाते याबद्दल अभिमान व्यक्त केला. 1992 पासूनच्या कामाच्या आठवणी कथन करीत त्यांनी यापुढील काळात वेळ आणि गुणवत्ता पाळून अधिक दर्जेदार काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
माजी शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून कौशल्य विकासाकरिता अभियांत्रिकी ज्ञान आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये महापालिका अभियंत्यांची जबाबदारी या विषयावर भाष्य करताना जागतिक तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने होत असलेले बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्याच्या भूमिकेतून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी अभियंत्यांनी तयार रहिले पाहिजे अशी भूमिका मांडली. कार्यक्रमाप्रसंगी महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंता यांना आवर्जुन निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक इ-शपथ ग्रहण करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai