नाईकांच्या स्वप्नाला महापौरांचा सुरुंग
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 28, 2018
- 648
बहुमजली वाहनतळाचा प्रस्ताव प्रलंबीत
नवी मुंबई ः 2013 साली सीबीडी सेक्टर 11 ते 15 मध्ये वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत अद्यावत सुविधा नवी मुंबईकरांना देण्याचे स्वप्न तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी दाखवले होते. या स्वप्नात सेक्टर 15 मध्ये अद्यावत बहुमजली वाहनतळ उभारुन तेथील पार्किंगची समस्या दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सादर केलेला हा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने नाईकांच्याच स्वप्नाला महापौरांनी सुरुंग लावल्याची चर्चा पालिकेत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत प्रथमच वन टाईम प्लॅनिंगची योजना राबवण्याची घोषणा केली होती. या घोषणेचे प्रात्यक्षित त्यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीतही सादर करुन वाहवा मिळवली होती. संपुर्ण नवी मुंबईचा दहा ते बारा हजार कोटी रुपये खर्च करुन विकास करण्याची योजना त्यांनी आखली होती. यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून नवी मुंबईतील सीबीडी येथील सेक्टर 11 व 15 हे भाग विकासासाठी निश्चित करण्यात आले होते. यामध्ये रस्त्यांचा विकास, डक्ट बांधुन ते भाड्याने देणे, अद्यावत पदपथांची निर्मिती व पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी पावसाळी गटारे, पार्किंगसाठी वाहनतळ उभारणे यासारखी कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी सुमारे 147 कोटी रुपये या दोन सेक्टरसाठी राखीव ठेवण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकेने सेक्टर 11 ची अतिशय सुंदर बांधणी या वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत केल्याचे नवी मुंबईकरांनी अनुभवले आहे.
दिवसेंदिवस सीबीडी सेक्टर 11 व 15 हा भाग वर्दळीचा होत असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु झाल्याने मुंबईतील अनेक कंपन्यांनी आपली कार्यालये या क्षेत्रात वळवली आहेत. या क्षेत्राचा विकास हा 1990 ते 1995 या कार्यकाळात झाला असल्याने त्यावेळच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार सोडलेल्या पार्किंग या आता अपुर्या पडत असल्याने रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने उभी केल्याने सकाळी आणि संध्याकाळी येथे वाहनांची कोंडी पाहावयास मिळते. त्याअनुषंगाने पालिका प्रशासनाने बेलापुर सेक्टर 15 येथे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर केला होता. यामध्ये तळमजल्यावर 121 दुचाकी व 87 चारचाकी, पहिल्या ते चौथ्या मजल्यावर 407 चारचाकी व 121 दुचाकी वाहने पार्किंगची सोय होणार होती. परंतु या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने हा प्रस्ताव प्रलंबित ठेवत असल्याचे महापौरांनी सभागृहास सांगितले. महापौरांच्या या भुमिकेवर आक्षेप घेत स्थानिक नगरसेवक दिपक पवार यांनी जर प्रस्ताव चुकीचा होता तर तो आणलाच का? असा सवाल करत चर्चेअंती यात बदल सुचवता येतील असे सुचवल्यावरही महापौरांनी हा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने सभागृहात आश्चर्य व्यक्त केले जात होते. वन टाईम प्लॅनिंग हे सत्ताधार्यांचे सर्वश्री गणेश नाईक यांचे स्वप्न असताना हा ठराव प्रलंबित ठेवणे म्हणजे नाईकांच्याच स्वप्नांना सुरुंग लावल्याची चर्चा पालिकेत आहे. दरम्यान, हा ठराव अर्थपुर्ण हेतूने मागे ठेवल्याचे बोलले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai