जनसंवादावरून ‘विसंवाद'
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 15, 2023
- 730
कर्मचाऱ्यांसह राज्यकर्त्यांची ईडीमार्फत चौकशीची मागणी
नवी मुंबई : नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आ. गणेश नाईक यांनी वाशी येथे जनसंवाद आयोजित केला होता. या आयोजनावरून तसेच अधिकाऱ्यांना नाईक यांनी ईडीच्या चौकशीची धमकी दिल्याने या जनसंवादाचे रूपांतर विसंवादात झाले आहे. त्यांच्या भाष्यावर उलट सुलट प्रतिक्रीया उमटल्याने नाईकांविरूध्द स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
मंगळवारी आ. गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी वाशी येथे विष्णूदास भावे सभागृहात जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नाईक गटाच्या सर्व समर्थकांनी झाडून हजेरी लावली होती. तसेच पालिका, महावितरण, सिडको व एमआयडीसीचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. अनेक माजी नगरसेवकांसह माजी खासदार संजीव नाईक, माजी आ. संदिप नाईक उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रश्नांची सरबत्ती उपस्थित अधिकाऱ्यांवर केली. अनेक प्रश्न पाठपूरावा करूनही मार्गी लागत नसल्याची तक्रार माजी नगरसेवकांनी केली. तर आ. गणेश नाईक यांनी पालिका आयुक्तांबरोबर झालेल्या अनेक बैठकांमधील प्रश्नांचे निरसन न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींची कामे मार्गी न लावल्यास कोणता अधिकारी व त्याचा नातेवाईक काय करतो, कोणती कामे घेतो हे लोकप्रतिनिधी व सामान्य जनतेला माहित आहे. असे सांगून अधिकाऱ्यांनी आपला कारभार सुधारला नाही तर मी स्वतः आयटी व ईडीकडे तक्रार करेन असा इशारा दिला. नाईकांच्या या वक्तव्याचे अनेक पडसाद नवी मुंबईत उमटले असून विरोधकांनी त्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
काँग्रेसचे नेते रविंद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांना पत्र देवून राजकीय पक्षांच्या दरबारात पालिका अधिकाऱ्यांना पाठवू नये असे नमुद केले आहे. यासाठी त्यांनी 2011 च्या शासकीय अधिसूचनेचा आधार घेतला असून त्यामुळे अधिकाऱ्यांचा वेळ नाहक खर्ची होत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नामदेव भगत यांनी अधिकाऱ्यांबरोबर पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या राजकर्त्यांचीही तक्रार नाईकांनी ईडीकडे करावी असा खोचक टोला लगावला आहे. नाईकांनी केलेला आरोप विशिष्ट माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरून केला आहे, परंतु त्यांची कामे नेहमीच होतात इतर कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बसणार असल्याची प्रतिक्रिया एका भाजप कार्यकर्त्याने दिली आहे.
- अधिकाऱ्यांसह राजकर्त्यांचीही नावे द्या!
नवी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचा महा‘सागर' असून गेली अनेक वर्षे तो राजकर्ते व अधिकारी यांच्या सहकार्याने ‘अक्षय्य'पणे सुरू आहे. या ‘सागरा'तून राजकर्ते व अधिकारी भ्रष्टाचाराचे मोती गेली अनेक वर्षे टिपत आहेत. ज्यांच्यावर टक्केवारीचे आरोप झाले त्यांनीच भ्रष्टाचारावर बोलावे हा विरोधाभास आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना धमकविणाऱ्या ‘सागरा'एवढा भ्रष्टाचार करणाऱ्या सर्वच अधिकारी व राजकर्त्यांची नावे ईडी व आयटीला द्यावीत, अशी प्रतिक्रीया नामदेव भगत यांनी दिली आहे.
बूडत्याला ईडीचा आधार
देशात ईडी, सीबीआय व आयकर विभाग यांची भीती दाखवल्याने अनेक राजकर्त्यांनी पक्षांतर केल्याचे महाराष्ट्राने अनुभवले आहे. नूकतेच राज्यात झालेले पक्षांतर व अजित पवार यांचे भाजपसोबत जाणे हे या शासकीय यंत्रणांमुळेच झाल्याचे बोलले जात आहे. चालू संसदिय अधिवेशनात भाजपच्या मंत्री मिनाक्षी लेखी यांनी गप्प बसा नाहीतर ईडी तुमच्या घरी येईल असे विरोधकांना सूनावले होते. त्यामुळे कामे करण्यासाठी आता ईडी, सीबीआय व आयकर विभागाची जर कोणी धमकी देत असेल तर योग्य नाही. हा ‘बूडत्याला काडीचा आधार' असा प्रकार असल्याची प्रतिक्रीया जनसंवाद कार्यक्रमात एका नागरिकाने दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai