पावसाळ्यानंतरच्या स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 18, 2023
- 252
पालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
नवी मुंबई ः पावसाळा सरल्यानंतरच्या कालावधीत शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे विभागातील विविध ठिकाणांना भेटी देत स्वच्छता कार्याला अधिक प्रभावीपणे गती देण्याचे निर्देश दिले. तसेच टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमधील 20 द.ल.लि पाणी वापरात यावे यादृष्टीने उदयोगसमुहांशी चर्चा करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
पावसामुळे रस्त्यांच्या कडेला व दुभाजकांमध्ये मोठया प्रमाणावर गवत अस्ताव्यस्त वाढलेले दिसत असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही रस्त्यातील रहदारीला व वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा आणत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने उदयान विभागाने प्राधान्याने मुख्य रस्ते व त्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरील दुभाजक आणि रत्याच्या कडेला वाढलेले गवत काढून घ्यावे तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांदयांची पुरेशा प्रमाणात छाटणी करावी असे निर्देशित केले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सातत्याने रहदारी सुरु असते त्यामुळे धूळ व बारीक मातीही दुभाजकांच्या कडेला खालच्या बाजूला साचून राहते. त्याच्या साफसफाईकडे रहदारीचे प्रमाण कमी असते अशा वेळी प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचप्रमाणे दिवसातून दोन वेळा स्वच्छता होणाऱ्या वाणिज्य भागातील स्वच्छता अधिक काटेकोरपणे होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. वाणिज्य भागातील व्यावसायिकांकडून ओला व सुका असे कचऱ्याचे दोन डबे आपल्या दुकानाच्या बाहेर दर्शनी भागी ठेवले जातील यावरही विशेष लक्ष दिले जावे असे त्यांनी निर्देशित केले.
सानपाडा येथे उड्डाणपूलाखाली बनविलेला गेमींग झोनमध्ये स्वच्छता व देखभालीकडे बारकाईने लक्ष देण्याचे व तेथे खेळायला येणाऱ्या मुलांशी चर्चा करुन त्यांना आवश्यक असणाऱ्या अधिकच्या सुविधा त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यांची पूर्तता करण्याकडे विशेष लक्ष देण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. त्याठिकाणी प्रशिक्षक उपलब्ध करून देऊन काही खेळांचे प्रशिक्षण देता येणे शक्य आहे काय, याचीही तपासणी करण्याचे त्यांनी सूचित केले. अशाच प्रकारे कोपरखैरणे येथील निसर्ग उदयानात निर्माण केलेला स्वच्छता पार्क मध्ये काळानुरुप बदल करण्याच्या दृष्टीने व तो डिजीटल युगाला साजेसा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने त्यामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे येथील मियावाकी शहरी जंगलाची झपाट्याने झालेली वाढ लक्षात घेऊन व जैवविविधतेत पडलेली लक्षणीय भर लक्षात घेता शहरात इतरही काही ठिकाणी अशा प्रकारची मियावाकी जंगले विकसित करणेबाबत पाहणी करावी व अहवाल सादर करावा असे आयुक्तांनी सांगितले.
यावेळी निसर्गोदयानाशेजारील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टला भेट देत तेथील कार्यप्रणाली सुयोग्य रितीने कार्यान्वित असल्याची आयुक्तांनी पाहणी केली. येथील पुनर्प्रक्रियाकृत पाणी उदयोगसमुहांना पुरविले जात असून 20 द.ल.लि. प्रकल्प क्षमतेपैकी 8 द.ल.लि. पुनर्प्रक्रियाकृत पाणी उदयोग समुहांच्या वापरासाठी पुरविण्यात येत आहे. यामधील पूर्णच्या पूर्ण 20 द.ल.लि पाणी वापरात यावे यादृष्टीने उदयोगसमुहांशी चर्चा करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. तसेच विविध ठिकाणच्या शिल्पाकृती, आय लव्ह नवी मुंबई पॉईंट्स दुरुस्त करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai