Breaking News
शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना लावले हुसकावून
उरण ः केंद्र शासनाने राज्यातील जेएनपीए बंदर पागोटे ते चौक (29.219 किलोमीटर) दरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीन फिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधायला मंजुरी दिली आहे. मात्र एका खाजगी उद्योजकाची जमीन वाचविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी उध्वस्त होणार असल्याने या ग्रीन फिल्ड मार्गाच्या जमीन सर्वेक्षणाला कळंबूसरे व चिरनेरच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. सर्वेक्षणाला आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले.
जेएनपीए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई विमानतळाचा विकास या गोष्टी लक्षात घेता या प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग कनेकटींव्हिटी (दळणवळण)वाढण्याची गरज असल्यामुळे हा मार्ग बांधण्याची संकल्पना पुढे आली आहे. ग्रीन फील्ड द्रुतगती महामार्ग हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या बिओटी तत्वावर विकसित केला जाणार आहे. त्यासाठी एकूण 4500.62 कोटी रुपये भांडवली खर्च होणार आहे. पंतप्रधान गतशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तत्वा अंतर्गत भारतातील प्रमुख आणि लहान बंदराशी जोडणाऱ्या रस्त्याच्या पायाभूत सुविधांचा विकास हा एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनाच्या प्रमुख प्राधान्य क्षेत्रापैकी एक आहे. मात्र हा ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्ग आता समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर व कळंबूसरे गावातून हा ग्रीन फिल्ड महामार्ग जाणार आहे. चिरनेर व कळंबूसरे मधील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या सर्व्हेला तीव्र विरोध केला आहे. 24 मार्च 2025 रोजी केंद्र शासनातर्फे चिरनेर व कळंबूसरे येथे सर्व्हेला आले असताना येथील शेतकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना हुसकावून लावले. भांडवलदारांच्या फायद्यासाठी व एका खाजगी कंपनीला वाचविण्यासाठी सदर रस्त्याचा आराखडा बदलून तब्ब्ल 300 मिटरचा वळसा घालून हा रस्ता बनविण्याचा घाट एनएचएआय ने घातल्यामुळे शेतकऱ्यांनी या जमिनीच्या मोजणीला तीव्र विरोध केला आहे. यावेळी शेतकरी विक्रांत पाटील, संतोष पाटील शिवप्रसाद भेंडे, देविदास पाटील, लक्ष्मण केणी आदी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai