निवृत्त अधिकाऱ्यांना आपल्या घरी लावावेत...
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 116
संबंधित अधिकाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी मी घेतो या वक्तव्यावर पालिका आयुक्तांचा निशांत भगत यांना अनाहूत सल्ला
नवी मुंबई ः अधिकाऱ्यांचे निवृत्ती आदेश मागे घेऊन त्यांना कामावर घेण्याचा लकडा सत्ताधारी नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांमागे लावला होता. वेळपडल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा पगार आम्ही देऊ अशी वल्गना निशांत भगत यांनी केल्यावर ते आपण आपल्या घरी लावावेत असा अनाहूत सल्ला आयुक्तांनी दिला. कोणालाही पगाराशिवाय ठेवणे गुन्हा असल्याचे सांगत न्यायालयातून आदेश आणल्यास आपण त्यांना सेवेत घेऊ असा विकल्प सत्ताधाऱ्यांना देऊन आयुक्तांनी हा चेंडू सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात टाकून सागर नाईकांनाच कोंडीत पकडल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 465 अन्वये अधिकाऱ्यांचा सेवा कार्यकाळ ठरवण्याचा अधिकार स्थायी समितीला असल्याचे सांगत सभागृह नेते सागर नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरुन 60 करण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव शासनाने निलंबित केला असून त्याबाबत म्हणणे मांडण्याची संधी महापालिकेला दिली आहे. असे असतानाही पुन्हा एकदा हा ठराव महापालिकेने मंजूर केला असल्याने त्याची अमंलबजावणी आयुक्तांनी करावी अशी मागणी सागर नाईक यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली.
सर्वसाधारण सभेत यावेळी आयुक्त व सत्ताधारी नगरसेवक यांच्यांत खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. नगरसेवक निशांत भगत यांनी संबंधित निवृत्त अधिकाऱ्यांना कामावर घेऊन त्यांचा पगार तुर्त आम्ही देऊ अशी सूचना सभागृहात केली. यावेळी आयुक्तांनी ते आपण आपल्या घरीठेवावेत असा अनाहूत सल्ला दिला. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला विनावेतन ठेवले तर तो गुन्हा असल्याचे भगत यांच्या निदर्शनास आणून दिले. कायद्यात अशा प्रकारची कोणतीही तरतूद नसताना आपण हा हट्ट का धरत आहात तसेच आपण मंजूर केलेला ठराव शासनाने निलंबित केला असल्याने त्याची अमंलबजावणी करण्याचे आपल्याला अधिकार नसल्याचे सागर नाईक यांना सांगितले. याउलट आपण शासनाला आपले म्हणणे मांडावे अथवा न्यायालयाकडून आदेश मिळवावेत जेणेकरुन मला संबंधित निवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत घेणे सोईचे होईल असे सूचवले. परंतु, निवृत्तीवय वाढवण्याच्या आपल्या मुद्दावर सागर नाईक ठाम राहिल्याने आयुक्तांनी आपल्याला सभागृहात उपस्थित राहण्याची ईच्छा नसल्याचे सांगितले. यावर उर्मटपणे तो तुमचा हक्क असल्याचे सागर नाईक यांनी सांगितल्याने अखेर आयुक्तांनी लेखी आदेश काढून मार्च 2027 पर्यंत सर्वसाधारण सभेत आयुक्तांच्यावतीने कोणते अधिकारी उपस्थित राहतील हे निश्चित केले.
- सत्ताधारी नगरसेवक बेचैन
सागर नाईक यांनी निवृत्तीच्या कार्यकाळावरुन पालिका प्रशासनाशी विनाकारण वितुष्ट निर्माण केल्याने सत्ताधारी नगरसेवक बेचैन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या प्रभागातील कामे आयुक्तांकडूनच करुन घ्यायची असल्याने सत्ताधारी नगरसेवकांची अवस्था ‘ईकडे आड तिकडे विहिर’ अशी झाल्याचे बोलले जाते. - हा हट्ट कशासाठी?
गेली 30 वर्षे नवी मुंबईत सत्ता असताना कधी पालिका अधिकाऱ्यांचे सेवाशर्ती नियम बनवण्यासाठी कोणताही पुढाकार सत्ताधाऱ्यांनी घेतला नाही. याउलट अनेक अधिकारी विना पदोन्नतीशिवाय निवृत्त झाल्याने ते सत्ताधाऱ्यांविरोधात आजही बोटे मोडत आहेत. आता 438 पालिका कर्मचारी निवृत्त होणार असल्याचे बोलले जात असून हा निर्णय त्यांच्या हक्कांसाठी की अन्य अर्थपुर्ण कारणांसाठी रेटुन धरला जात असल्याची चर्चा आहे.
- उप आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या कायम समावेशनासंदर्भात सदर नियुक्ती समाप्त करुन त्यांना सेवामुक्त करुन मुळ सेवेकडे परत पाठवण्याचा ठराव नगरसेवक सुरज पाटील यांनी मांडला होता. याला शिवराम पाटील, द्वारकानाथ भोईर, विजय चौगुले यांनी विरोध केला. तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर एखाद्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव आणणे हे योग्य नसल्याचे सांगितले. विरोधानंतर सदर प्रस्ताव विधी विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवण्याची सूचना सागर नाईक यांनी मांडली. तद्नतर महापौरांनी सदर प्रस्तावाला स्थगिती देत तो विधी विभागाकडे वर्ग केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai