पावसाळ्यात गांभीर्यपूर्वक सतर्कतेने काम करा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 36
विशेष बैठकीत महापौरांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देश
नवी मुंबई ः मागील तीन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे नवी मुंबईतील काही भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले असून याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला हे लक्षात घेत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी यापुढील पावसाळा कालावधीत अधिक गांभीर्यपूर्वक सतर्कतेने काम करावे असे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी पावसाळी परिस्थितीच्या विशेष आढावा बैठकीप्रसंगी दिले.
1 जुलै रोजी भर पावसात बेलापूरपासून दिघ्यापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रातील स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर बुधवारी महापौर पाटील यांनी विशेष बैठक बोलावत यापुढील कालावधीत प्रत्येक पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी आपली यंत्रणा नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता सतर्क राहिली पाहिजे असे निर्देशित केले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, नगरसेवक रविंद्र इथापे व शुभांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते. नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास शहरातील काही अतिसखल भागात पाणी साचते. मात्र याठिकाणी महानगरपालिकेची यंत्रणा अधिक सक्षमतेने नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असली पाहीजे असेही निर्देश संबंधित विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
विशेषत्वाने पाणी साचल्याचे आढळले अशा ठिकाणी रस्त्यावरून पाणी गटारात वाहून नेणाऱ्या वॉटरएन्ट्रीज युध्द पातळीवर तातडीने खुल्या कराव्यात व त्यासोबतच पाऊस पडत असताना त्यामध्ये कचरा अडकून त्या बंद होऊन पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. बुधवारी एलपी सिग्नलजवळ पाण्यात उघड्या असलेल्या विद्युत तारेमुळे झटका लागून 2 मुली जखमी झाल्याची दुर्घटना लक्षात घेत संबंधित प्रकरणात दोषी असलेल्यांवर प्रशासकीय कारवाई करावी असे महापौरांनी सूचित केले तसेच अशी घटना पुन्हा घडू नये याकरिता पालिकेच्या विद्युत विभागाने एमएसईडीसीएलच्या अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण पाहणी करावी व आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती करून घ्यावी असेही निर्देशित करण्यात आले. सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्यात यावा तसेच सर्व शाळांच्या आवारातील झाडांची त्वरित छाटणी करून घ्यावी असेही निर्देश देण्यात आले. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेणे व त्यादृष्टीने मदत कार्यासाठी तत्पर राहणे ही आपली जबाबदारी असून संबंधित अधिकाऱ्यांवर आपापल्या कामाची जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे असे महापौरांनी स्पष्ट केले. सर्व कोचींग क्लासेस व ट्युशन्सच्या जागांची स्ट्रक्चरलदृष्ट्या पाहणी करावी तसेच अग्निसुरक्षेच्या दृष्टीनेही पाहणी करावी असे निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याप्रसंगी दिले. आपल्या दुर्लक्षामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची नमुंमपा कर्मचाऱ्यांनी काळजी घेतानाच नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी प्रत्येकाने तत्पर रहावे असे सांगतानाच महापौर सुजाता पाटील यांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी नागरिकांनी 1800222309 / 1800222310 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
- महापौरांनी केली पावसाळी स्थितीची पाहणी
मागील तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाच्या अनुषंगाने नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी बेलापूरपासून दिघ्यापर्यंत महापालिका क्षेत्रात विविध विभागांतील सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी अधिकारी, कर्मचारी दक्षतेने कार्यरत राहतील असे नागरिकांना आश्वस्त केले. भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाणी उपसा पंपांची संख्या वाढवून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी अधिकारी, कर्मचारी दक्षतेने कार्यरत राहतील असे नागरिकांना आश्वस्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai