Breaking News
नवी मुंबई : मालमत्ताकर थकबाकीदारांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेने ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीदरम्यान ही योजना असणार असून, थकबाकीदारांना दंडात्मक रकमेवर 75 टक्केपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे या एकदाच मिळणार्या अभय योजनाच्या सुवर्णसंधीचा मालमत्ताकर थकबाकीदारांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे अनेकांना मालमत्ता कर भरता आलेला नाही. ज्या व्यवसायिक व निवासी मालमत्तांचे कर अनेक वर्षांपासून थकले आहेत, त्यांच्या व्याजाची व दंडाची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे पालिकेने मालमत्ता करामध्ये सूट द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघासह अनेक लोकप्रतिनिधींनी केली होती. याची दखल घेऊन आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे.
15 डिसेंबरपासून 15
फेब्रुवारीपर्यंतच ही योजना आहे. या कालावधीमध्ये थकबाकीदारांनी कराची संपूर्ण रक्कम भरली व दंडापैकी 25 टक्के रक्कम भरली तर त्यांना उर्वरित 75 टक्के दंडात्मक रकमेमध्ये सूट दिली जाणार आहे. ही रक्कम त्यांना एकाचवेळी भरणा करावी लागेल. ती टप्प्याटप्प्याने भरता येणार नाही. या योजनेसाठीची माहिती मनपाच्या संकेतस्थळावर व 8 विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. मोबाइल अॅपवरही विशेष लिंक देण्यात येणार आहे. ही अभय योजना राबविताना थकबाकी वसूलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून प्रत्येक थकबाकीदाराला सौजन्यपत्र दिले जाणार आहे. अभय योजना सुरू होण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमांना अभय योजना लागू राहणार नाही. सदर अभय योजना सुरु होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमेच्या परताव्यासाठी अभय योजनेअंतर्गत दावा करता येणार नाही. रक्कमेचा भरणा महापालिका मुख्यालयाप्रमाणेच सर्व आठही विभाग कार्यालये आणि संलग्न भरणा केंद्रे याठिकाणी रोख, धनादेश, धनाकर्ष याव्दारे तसेच ऑनलाईन पध्दतीने डेबीट कार्ड/ क्रेडीट कार्ड/इंटरनेट बँकींग/एनईएफटी/आरटीजीएस याद्वारेही नागरिकांना सुलभ रितीने थकीत मालमत्ता कर भरण्याची सुविधा असणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai