Breaking News
एकूण 82 लाख नागरिकांना लसीकरण ; मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या.
कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रात सुमारे एक कोटी सहा लाख डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी 88 लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. 5 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 81 लाख 21 हजार 332 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज 4 लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
80 लाखाहून अधिक लोकांना लसीकरण करुन महाराष्ट्राने देशात अग्रक्रमात सातत्य राखल्याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन करतानांच लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी केल्या. 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची राज्य सरासरी 12.3 टक्के असून राज्यातील भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे प्राधान्याने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा लस पुरवठा होण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल असे मुख्य सचिवांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai