Breaking News
1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा अभय योजना
नवी मुंबई ः कोव्हीड कालावधीत लॉकडाऊन व इतर कारणांमुळे थकबाकीसह मालमत्ताकर भरणा करण्यात नागरिकांना भेडसावणार्या अडचणी लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत ‘मालमत्ताकर अभय योजना 2021-22’ जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांसाठी हा फार मोठा आर्थिक दिलासा आहे.
आर्थिक वर्ष 2019 ते 20 या काळात सर्व प्रकारच्या करांपोटी 2 हजार 267 कोटी रुपये जमा झाले होते, तर आर्थिक वर्ष 2020 ते 21 या वर्षात 2 हजार 141 कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे महापालिकेने आर्थिक वर्ष 2021 ते 22 साठी तीन हजार कोटींचे लक्ष्य ठेवले होते. गेल्या सहा महिन्यांत पालिकेला सर्व करांपोटी 15 सप्टेंबरपर्यंत 1077 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे थकीत मालमत्ताकर वसुलीकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. दि. 1 ऑक्टोबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीत या अभय योजनेचा लाभ मालमत्ताकर थकबाकीदारांना घेता येणार आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंतच्या थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% इतकी भरीव सूट देण्यात आली आहे. या योजनेमध्ये जाहीर केलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकीत रक्कम अधिक केवळ 25% दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांची 75% दंडात्मक रक्कम माफ होणार आहे. ही रक्कम थकबाकीदारांनी एकाचवेळी भरणा करावयाची असून ती टप्प्याटप्प्याने भरता येणार नाही. त्यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत न थांबता नागरिकांनी लगेच आपली आपल्या मालमत्ताकराची थकीत रक्कम व त्यावर केवळ 25 टक्के दंडात्मक रक्कम भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. 1 ऑक्टोबर पासून अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी दंडात्मक रक्कमेतून 75 टक्के सूट वजा केल्यानंतर देय रक्कम किती राहील याची माहिती पालिकेच्या वेबसाईटवर असून रक्कम भरणा तसेच सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai