4925 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2023
- 499
नवी मुंबई ः महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सन 2023-24 साठी नवी मुंबई महापालिकेचा 4925 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. सदर अर्थसंकल्पात नवी मुंबईकरांसाठी अनेक नवीन गुणवत्तापुर्ण पायाभुत सुविधा प्रकल्पांची तरतूद आयुक्तांनी प्रस्तावित केली आहे. या अर्थसंकल्पासोबत महापालिका परिवहन उपक्रमाचाही 436 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला आहे. कोणतीही करवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पाचे नवी मुंबईकरांनी स्वागत केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.5 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर करुन मंजुर केला आहे. पालिकेने यावेळी 4925 कोटीचे उत्पन्न गृहित धरले असून त्यासमोर 4922 कोटींचा खर्च प्रस्तावित केला आहे. या उत्पन्नामध्ये शासनाकडून 362 कोटी रुपयांचे अनुदान गृहित धरले असून एलबीटीपोटी 1626 कोटी रुपये अनुदान अपेक्षित धरले आहे. गेल्यावर्षी पालिकेने 571 कोटी रुपये मालमत्ता करापोटी मिळतील अशी अपेक्षा धरली होती पण 2022-23 या काळात पालिकेला 327 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. पुढील आर्थिक वर्षासाठी पालिकेने 456 कोटी रुपयांचे उत्पन्न मालमत्ता करातून गृहित धरले आहे.
शहरातील सर्व मालमत्तांचे लिडार तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण सुरु असल्याने पालिकेने मालमत्ता करातून अतिरिक्त 100 कोटी रुपये मिळणार असल्याचे आपल्या प्रस्ताविकेत आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले. हीच बाब नगररचना विभागाची असून गेल्यावर्षी 306 कोटी रुपयांचे उत्पन्नापैकी फक्त 198 कोटी रुपये उत्पन्न मिळालेले असतानाही पालिकेने यावेळी 355 कोटी रुपयांचे उत्पन्न गृहित धरले आहे. शहरांमध्ये पुनर्बांधणी प्रकल्पांना नवीन बांधकाम परवानगी देताना रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणात वाढीव चटई निर्देशांक देण्यात येत असल्याने हे अतिरिक्त उत्पन्न पालिकेने गृहित धरले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
यावेळी पालिका आयुक्तांनी नवी मुंबई महापालिकेने 2023-24 या आर्थिक वर्षात कोणकोणते सामाजिक व पायाभुत सेवासुविधांचे प्रकल्प हाती घेतले याची माहिती दिली. डेब्रिज प्रक्रिया प्रकल्प, कचऱ्यापासून खत व वीज निर्मितीसाठी पीपीपीच्या माध्यमातून 400 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले. वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी शहरात बहुभाषिक मध्यवर्ती वाचनालय तसेच नेरुळ येथे सायन्स पार्क उभारण्यात येत असल्याचे नमुद केले. दिव्यांगांसाठी मैदान विकसीत करणे, वाशी येथील तरणतलाव सुरु करणे, मोरबे येथे 100 मेगाव्हॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे या अंदाजपत्रात प्रस्तावित केले आहे. शहराची लोकसंख्या वाढत असल्याने नवीन जलस्त्रोत शोधणे, पाणी गळती कमी होण्यासाठी स्काडा प्रणाली कार्यान्वित करणे, सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे आणि माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत मियावॉकी पद्धतीने 1 लाख 35 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
समाज विकास विभागाने ज्येष्ठ नागरिक, आदिवासी घटक, तृतीयपंथी व्यक्ती, शररिविक्रय करणाऱ्या महिला, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अनुदान व अर्थसहाय्य याबाबत अनेक योजना या अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्या आहेत. अग्नीशमन विभागाकरिता 68 मीटर उंचीचे वाहन खरेदीची तरतूद केली आहे. शिक्षण विभागासाठी, विद्यार्थ्यांसाठी अनेक योजनांबरोबर भविष्यात निवडून येणाऱ्या नगरसेवकांसाठी नगरसेवक स्वेच्छा निधी म्हणून 10 लाख तर प्रति नगरसेवक प्रभाग निधी म्हणून 60 लाखांची तरतूद या अंदाजपत्रकात केली आहे. शहराचे आरोग्य सुधारावे म्हणून वृक्षरोपनाबरोबर शहरात हवा शुद्धीकरण टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. आर्श्चयाची बाब म्हणजे एवढ्या सुविधा नवी मुंबईकरांना प्रस्तावित केल्या असतानाही एक रुपयाची करवाढही पालिका आयुक्त नार्वेकर यांनी नवी मुंबईकरांवर लादलेली नाही. या करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत नवी मुंबईकरांसह सर्वच राजकीय पक्षांनी केले आहे.
कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नसली तरी नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवासुविधा पुरविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. पालिकेच्या महसूलात वाढ होण्याच्या दृष्टीने उत्पन्नाच्या नव्या स्त्रोतांचा शोध घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. महापालिकेमार्फत होणारी नागरी सुविधा कामे ही प्राधान्यक्रम ठरवून करण्यावर भर दिला जाईल, जेणेकरुन खर्चावर नियंत्रण राहील. नागरिकांना विहित वेळेत कालबध्द सेवा पुरविणे याची बांधिलकी जपत अधिक प्रभावीपणे ‘लोकाभिमुख प्रशासन' राबविण्यावर भर असणार आहे. - राजेश नार्वेकर, आयुक्त, न.मुं.म.पा
पालिका आयुक्त व प्रशासक राजेश नार्वेकर यांनी कोणत्याही प्रकारचा वाढीव कर नवी मुंबईकरांवर लादला नाही याचे मी स्वागत करतो. गेली 25 वर्षे नवी मुंबई महापालिका कोणत्याही प्रकारची करवाढ न करता नवी मुंबईकरांना हव्या असलेल्या सुविधा अव्याहतपणे पुरवत आहे याचा मला अभिमान आहे. नवी मुंबई महापालिका ही देशातील 25 वर्षे करवाढ न करणारी एकमेव महापालिका आहे. महापालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून अनेक पुरस्कार त्यांनी नागरिकांना पुरवलेल्या सेवेमुळे मिळाले आहेत. त्यामध्ये पालिका कर्मचारी, अधिकारी व जागरुक लोकप्रतिनिधींचा महत्वाचा वाटा आहे. - आमदार, गणेश नाईक
नवी मुंबई महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी कोणत्याही प्रकारची करवाढ नागरिकांवर लादली नसल्याने त्यांच्या निर्णयाचे मी मनपुर्वक स्वागत करते. या अंदाजपत्रकात पालिका आयुक्तांनी बेलापुर येथील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालय व मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी भरघोस तरतूद या अंदाजपत्रकात केली आहे. नवी मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या अंदाजपत्रकाचे मी स्वागत करते.- आमदार, मंदा म्हात्रे
नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांवर कोणतीही करवाढ न लादता अंदाजपत्रकात अनेक पायाभूत व सामाजिक प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद केली आहे. अनेक उड्डाणपुले, पार्किंग जागा, दिव्यांग मुलांसाठी विशेष योजना अंदाजपत्रकात प्रस्तावित केल्याने हा अर्थंसंकल्प समाजातील सर्व घटकांसाठी सर्वसमावेशक असा आहे. या अर्थसंकल्पात क्रिडा व सांस्कृतिक विभागासह अग्निशमनदल अद्यावत करण्यासाठी केलेली तरतूद नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्पृहनीय आहे. - विजय नाहटा, शिवसेना
4 कोटींनी सुरुवात केलेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पाने आज 5 हजार कोटींचा आकडा गाठला आहे हे नवी मुंबईतील करदात्यांच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब करत आहे. गेली 25 वर्षे कोणतीही करवाढ न करता पालिका नवी मुंबईकरांना विविध दर्जेजार सुविधा व सेवा पुरवत आहे. त्यामध्ये शाळा, आरोग्य, सार्वजनिक वाहतुक, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धनाच्या कामाचा समावेश आहे. हे अंदाजपत्रक सर्व घटकांचा समतोल साधणारे आहे. - अनिल कौशिक, काँग्रेस
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai