Breaking News
मुंबई : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 19 ऑगस्ट रोजी पद्मविभूषण रतन टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांनी 25 लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरुपात पुरस्कार प्रदान केला.
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषणपुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांना तर उद्योगिनी पुरस्कार, किर्लोस्कर समुहच्या गौरी किर्लोस्कर, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमित्र पुरस्काराचे स्वरुप 15 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणिमानपत्र, उद्योगिनी पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
टाटा म्हणजे ट्रस्ट, टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समुहाचे रतन टाटा यांना सदर पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, टाटा सन्सचे चेअरमन तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, आदि उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai