
‘इंडिया'ने फुंकले एनडीए विरुद्ध रणशिंग
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 02, 2023
- 380
मुंबईच्या बैठकीला 28 विरोधी पक्षांची उपस्थिती
मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया आघाडीने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला 28 पक्षांनी आपली उपस्थिती दर्शविली. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीने एनडीए विरुद्ध रणशिंग फुंकले आहे. यावेळी आघाडीची 14 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून ‘जुडेगा भारत, जीतेगा भारत' या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत जाहीर केला. महाराष्ट्रातून 2024 च्या लोकसभांच्या निवडणुकीचे बिगुल वाजवले गेल्याने त्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
मोदी-शहा सरकारला आसमान दाखवण्यासाठी काँग्रेस पक्षाने देशातील सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणत ‘इंडिया' ही आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीत देशभरातून 28 पक्ष सामिल झाले असून मोदी सरकारला हटवणे आणि देशात लोकशाही व सर्वसमभाव पुन्हा रुजवणे हे मुळ उद्दिष्ट या आघाडीने समोर ठेवले आहे. देशात अनेक राज्यात सुरु असलेल्या धार्मिक हिंसाचार, केंद्र सरकारची दडपशाही, ईडी-सीबीआय या संस्थांचा गैरवापर त्याचबरोबर वाढती महागाई व बेरोजगारी या मुद्द्यांवर आगामी लोकसभा निवडणुक लढवण्याचे लक्ष सर्वच विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. या बैठकीला तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, जेडीयूचे नेते नितीशकुमार, जेडीएसचे नेते लालूप्रसाद यादव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह सोनिया गांधी व राहुल गांधी हे उपस्थित होते. इंडिया आघाडीच्या बैठकीचे आयोजन महाविकास आघाडीकडून करण्यात आले.
गुरुवारी रात्र आणि शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. या बैठकांमध्ये सर्व सहमतीने इंडिया आघाडीची 14 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅम्पेन कमिटी, वर्किंग ग्रुप ऑफ सोशल मीडिया, वर्किंग ग्रुप ऑफ मीडिया आणि वर्किंग ग्रुप ऑफ रिसर्च या चार समितींची देखील स्थापना करण्यात आली आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांचा या कमिटींमध्ये समावेश करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्ष देशाच्या 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात, या एकजुटीमुळे भाजपचा पराभव निश्चित आहे असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सांगितले.
इंडियाच्या बैठकीतले ठराव
- इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरच पूर्ण केली जाईल.
- इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेणार आहेत.
- इंडियामधील पक्ष विविध भाषांमधून ‘जुडेगा भारत, जीतेगा भारत' या इंडियाच्या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करतील
‘जुडेगा भारत, जीतेगा भारत' ची रणनिती
देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण झाली असून अविश्वासाचे वातावरण धर्माधर्मांत, जातीपातीत, पसरल्याने देश एकसंध राखण्यासाठी ‘जुडेगा भारत, जीतेगा भारत' या घोषणेने विविध राज्यात रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत जनतेला भेडसावणाऱ्या महागाई व बेरोजगारी या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर दिला जाणार असल्याचे ठरवण्यात आले.
- जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच
इंडिया आघाडी कशापद्धतीने जागा वाटप करते याकडे मोदी सरकार नजर लावून बसले आहे. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरवण्यात येणार असल्याचे इंडिया आघाडीच्यावतीने सांगण्यात आले. सर्व विरोधी पक्ष एकत्रपणे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी ठराव करण्यात आला असून भाजपासमोर एक उमेदवार देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचा असेल असे सुतोवाच आघाडीकडून करण्यात आले. - मुदतपूर्व लोकसभा निवडणुक?
इंडिया आघाडीच्या बैठकीत एनडीएला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय 28 पक्षांनी एकत्र घेतला आहे. एकिकडे इंडिया आघाडीचा निर्धार सुरु असतानाच केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. या बैठकीत वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. वन नेशन, वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना करण्यात आली असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. हे विधेयक पास झालं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील. लोकसभेच्या निवडणुका मुदतपूर्व होण्याचीही शक्यता विरोधक वर्तवत आहेत.
समन्वय समितीचे सदस्यांची नावे
- केसी वेणुगोपाल, काँग्रेस
- शरद पवार, राष्ट्रवादी
- टीआर बालू, डीएमके
- हेमंत सोरेन,
- झारखंड मुक्ती मोर्चा
- संजय राऊत,
- शिवसेना ठाकरे गट
- तेजस्वी यादव, आरजेडी
- अभिषेक बॅनर्जी, टीएमसी
- राघव चढ्ढा, आप
- जावेद अली खान, समाजवादी पार्टी
- ललन सिंह, जनता दल युनायटेड
- डी राजा, सीपीआय
- ओमर अब्दुला, नॅशनल कॉन्फरन्स
- मेहबुबा मुफ्ती, पीडीपी
- सीपीआयच्या एका नेत्याचं नाव लवकरच जाहीर करणार, असं संजय राऊत यांनी सांगितलं
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai