Breaking News
पुण्याच्या सभेत आरक्षणाबाबत राहुल गांधी यांची मोठी घोषणा
पुणे : काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची शुक्रवारी पुण्यात सभा झाली. या सभेत त्यांनी आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर देशात आरक्षणाची असलेली 50 टक्के मर्यादा हटवू, अशी घोषणा त्यांनी केली. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचं आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
“ ही लढाई संविधानाला वाचवण्यासाठी आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी संविधान, लोकशाहीला वाचवण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस संविधान संपवू इच्छित आहेत. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे. या संविधानात महात्मा फुले यांचे विचार आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु ज्यांनी मिळून हिंदुस्तानच्या जनतेसोबत वर्षानुवर्षे लढाई करुन देशाच्या जनतेला दिलं. संविधानाला नरेंद्र मोदी आणि भाजप बदलण्यासाठी इच्छुक आहेत”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
संविधानामुळे भारताच्या गरीब, होतकरु, शेतकरी, मागास, दलित, अल्पसंख्याक, आदिवासींना अधिकार मिळतात. या संविधानाशिवाय काहीच शक्य नाही. जे काही तुमच्या हातात आहे ते सर्व देशाच्या फक्त 20 ते 25 लोकांच्या हाती चाललं जाईल”, असा दावा राहुल गांधींनी केला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार यांनी निवडुन देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai