Breaking News
मुंबर्ई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवाजी पार्क येथे झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी “नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीवाले लोक दिवस-रात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. माझं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना आव्हान आहे की त्यांनी राहुल गांधींकडून एक वाक्य वदवून घ्यावं. ‘मी आयुष्यात कधीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार नाही' एवढं एक वाक्य राहुल गांधींकडून वदवून घेऊन दाखवा.”
मोदी म्हणाले, “घुसखोरांविरोधात लढणारी सेना अशी शिवसेनेची एकेकाळी ओळख होती. तीच नकली शिवसेना आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध करत आहे. हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्यास या नकली शिवसेनेचा विरोध आहे. मी इतक्या वर्षांमध्ये एखाद्या पक्षाचं अशा प्रकारे हृदयपरिवर्तन झालेलं कधी पाहिलं नाही. नकली शिवसेना केवळ व्होट बँकेला खूश करण्यासाठी, मतांसाठी काही लोकांचं तुष्टीकरण करण्यासाठी ज्या लोकांनी मुंबईला धोका दिला, ज्या कसाबने मुंबईकरांना मारलं, त्याच कसाबला क्लीनचिट देणाऱ्या लोकांच्या बाजूला जाऊन बसली आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी आहे, असं सूचक विधान करत विकसित भारताचा रोडमॅप मतदारांसमोर मांडला.ते म्हणाले की, मुंबईमध्ये पुढच्या काळात रेकॉर्डब्रेक गुंतवणूक येणार आहे. येत्या काही वर्षांतच जेव्हा मी तुमच्यामध्ये येईन, तेव्हा आपण जगातीत तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनलेले असू, ही माझी गॅरंटी आहे. कलम 370 हटेल हे अशक्य वाटत होतं. पण ती भिंत मी गाडली आहे. जगातील कोणतीच ताकद पुन्हा 370 आणू शकत नाही. राम मंदिर उभारणीसाठी आपण 500 वर्षे लढा दिला. जनादेश नाकारुन यांनी सरकार बनवले तेव्हा त्यांनी मेट्रो सारखे प्रकल्प लटकवले. मोदी मुंबईला तिचे हक्क देण्यासाठी आलाय, असे ते म्हणाले. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईत चालेल, तो दिवसदेखील दूर नाही, असे ते म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai