उड्डाणपुलाने अडवली वाट
- by मोना माळी-सणस
- Jun 21, 2024
- 447
नऊ महिन्यांनंतरही काम कागदावरच
नवी मुंबई ः तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ ठाणे-बेलापुर रस्ता ओलांडताना होणारी वाहतुक कोंडी आणि अपघात होऊन अनेकांनी गमावलेला जीव यामुळे महापालिकेने येथे नागरिकांसाठी उड्डाणपुल बनविण्याचे काम प्रस्तावित केले आहे. परंतु 9 महिने उलटून गेल्यावरही उड्डाणपुल कागदावरच राहिल्याने स्थानिकांना वाहतुक कोंडीबरोबर ध्वनी व वायु प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेचा हा कारभार म्हणेज आजारापेक्षा उपचार भयंकर असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी दिली.
तुर्भे स्टोअर येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी आणि रस्ता ओलांडतांना होणारे अपघात टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेने तुर्भे रेल्वे स्थानकासमोर उड्डाणपुल बांधण्याचे काम हाती घेतले होते. या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन 25 एप्रिल 2022 रोजी ठेकेदार मे. महावीर रोड्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना कार्यादेश देण्यात आला होता. या कामाचा खर्च 30 कोटी रुपये असून ते पुर्ण करण्याची तारीख 25 ऑक्टोबर 2023 होती. उड्डाणपुलाच्या आराखन्यात महत्वाचे बदल स्थानिक नेत्यांनी सूचवल्याने काम सुरु करण्यास उशिर झाल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात येत आहे.
ठेकेदाराने काम सुरु करुन जवळजवळ वर्ष होत आहे तरी खोदकामाव्यतिरिक्त इतर कोणतेही काम ठेकेदाराकडून करण्यात आले नसून गेली 9 महिने वाहतुकदार व प्रवाशी भयंकर वाहतुक कोंडीचा सामना करत आहेत. या वाहतुक कोंडीमुळे तुर्भे स्टोअर लगतच्या भागात ध्वनी प्रदुषण आणि वायु प्रदुषण वाढल्याने त्याचा नाहक फटका स्थानिकांना बसत आहे. सकाळी आणि संध्याकाळी चाकरमान्यांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. पालिकेच्या या गलथान कारभाराचा ताण वाहतुक पोलीस यंत्रणेवरही पडला असून वाहतुकीचे नियोजन करण्यात महत्वाचा वेळ वाया जात आहे. गेले 9 महिने हे काम बंद असून याबाबत पालिकेने कोणत्याही प्रकारच्या सूचना नागरिकांना व पोलीस प्रशासनाला दिल्या नसल्याने काम कधी सुरु होणार याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. याप्रकरणी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क साधला असता उड्डाणपुलाच्या सुधारित डिझाईनचे काम सुरु असल्याने कामाला उशीर होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
- संवेदनाहिन जनप्रतिनिधी
गेले 9 महिने नवी मुंबईतील जनता ठाणे-बेलापुर रस्त्यावरील वाहतुक कोंडीमुळे नरकयातना भोगत असतानाही एकाही स्थानिक जनप्रतिनिधीने आवाज उठविला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तुर्भे स्टोअर येथे चार नगरसेवक आणि नवी मुंबईला दोन आमदार असताना त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष करावे हे सामान्यांच्या पचनी पडत नाही. ठेकेदार व दादांचे असलेले मधूर संबंध सर्वश्रुत असून त्यामुळेच जनप्रतिनिधींची दातखिळी बसल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. - भरपावसात डांबरीकरण
ठेकेदाराने खोदलेल्या अतिरिक्त मार्गिकेवर भराव टाकून तिथे केवळ एक इंचाचे डांबरीकरण करण्याचे काम भरपावसात महापालिकेने सुरु केले आहे. अस्तित्वात असलेला काँक्रिटचा रस्ता खोदायचा आणि पुन्हा डांबरीकरण करायचे अशी अघोरी कामाची पद्धत पालिकेने अंगीकारली असल्याने याबाबत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या डांबरीकरणाचा आणि भरावाचा खर्च कोणाकडून वसूल करणार हा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे. तसेच केवळ एक इंचाचेच हे डांबरीकरण असल्याने त्याच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. - सदोष आराखने मग कामाची लगीनघाई का?
उड्डाणपुलाचे आराखने जर सदोष होते तर निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराला कार्यादेश देण्याची लगीनघाई शहर अभियंता विभागाने का केली? असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे. राजकीय दबावापोटी कार्यादेश देवून सागरातून मोती काढण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा दबक्या आवाजात महापालिकेत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस