Breaking News
31 जुलैपर्यंत घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार
नवी मुंबई : इर्शाळवाडी दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोद्वारे उभारण्यात येणाऱ्या 44 घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. 31 जुलैपूर्वी घरांचे व इतर सोयीसुविधांचे बांधकाम पूर्ण करून घरांचा ताबा रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर तातडीने घरांचे वाटप होणार आहे.
इर्शाळवाडीतील आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 2.6 हेक्टर जागा देऊ केली. या दरडग्रस्त नागरिकांना 300 चौरस मीटर क्षेत्रफळाचे एकूण 44 रहिवास वापराखालील भूखंड, सपाट पातळीवर देण्यात आले आहेत. ही जागादेखील काही प्रमाणात जमिनीपासून उंचावर असल्यामुळे भविष्यात कुठलाही धोका टाळण्यासाठी जागेच्या सर्व बाजूस 8-9 मीटरची आरसीसी संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे.
इर्शाळवाडी आपद्ग्रस्तांना घरे बांधून देण्याची जबाबदारी ही शासनाने सिडकोवर सोपवली होती. त्याकरिता अवघ्या 6 महिन्यांचा कालावधी सिडकोला देण्यात आला होता. परंतु, दुर्घटनेनंतर पुढील तीन महिने पाऊस सुरू राहिल्यामुळे घरांचे काम सुरू करण्यास सिडकोला अडचणी उद्भवत होत्या, असे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने नोव्हेंबर 2023 मध्ये सिडकोने घर उभारणीच्या कामास सुरुवात केली. आतापर्यंत 44 पैकी 30 घरांची उभारणी पूर्ण झाली असून, 14 घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या 31 जुलैपर्यंत सर्व 44 घरांसह इथल्या नागरिकांसाठी अंगणवाडी, समाजमंदिर, उद्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, खेळाचे मैदान आदी सुविधांची निर्मिती सिडको पूर्ण करणार आहे. तसेच इथल्या नागरिकांना पाणी, वीज, रस्ते आदी सुविधाही सिडको उपलब्ध करून देणार आहे. यासाठी सिडकोने एकूण 33 कोटी रुपये (जीएसटीसह) पदरचे खर्च केले आहेत.
.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai