मराठा आंदोलनाला मुदतवाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 29, 2025
- 190
आंदोलनामुळे मुंबईत जाम ; नागरिकांमध्ये घबराहट
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदानात शासनाच्या मंजुरीनंतर आमरण उपोषण सुरु केले आहे. पोलीसांनी फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, परंरतु दिवसअखेर ही मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी जर आंदोलकांनी माघार घेतली नाही तर काय? या प्रश्नाने मुंबईकरांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर आंदोलनाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल नागरिकांना पडला असून त्यामुळे सरकारच्याच मनसुब्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
जरांगे-पाटील यांनी ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मराठा आंदोलनाची हाक दिल्याने त्यांच्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहीले होते. महाराष्ट्र सरकार निदान हे आंदोलन गणेशोत्सव संपेपर्यंत तरी पुढे ढकलेल अशी अपेक्षा सर्वसाधारण नागरिकांना होती. परंतु, सरकारनेच जरांगेंना आणि आंदोलनातील समर्थकांना मुंबईत एक दिवसाचे आंदोलन करण्याची परवानगी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय सुरु आहे याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. त्यातच पुन्हा एकदा एक दिवसाची मुदतवाढ दिल्याने मुंबईत चाकरमान्यांसह वाहतुकीचे बोजवारा उडाल्याने प्रचंड संतापाची लाट सरकारविरुद्ध पसरली आहे. आंदोलनाविरुद्ध जनमत उभे करण्याची सरकारची रणनिती आता सरकारच्याच अंगलट आल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे.
यापुर्वी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत मनोज जरांगे यांना थोपवले होते. मात्र, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक दिल्यानंतर 27 तारखेपासून जालन्यातील अंतरलवाली सराट्यातून निघालेला भव्य मोर्चा शुक्रवारी सकाळी 10 वाजता मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. दरम्यान, उपोषणस्थळी दाखल होताच मनोज जरांगेंनी शिवरायांना अभिवादन करून उपोषणाला सुरुवात केली आहे. सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला. मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हटायचं नाही हलायचं नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असंही जरांगे म्हणाले. सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला. शनिवारी आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, आंदोलनास एकदिवसाच्या मुदतवाढीची परवानगी पोलीसांकडून देण्यात आली असून काही नियम व अटी त्यात आहेत. आंदोलनात निदर्शकांची संख्या 5 हजार पेक्षा जास्त नसावी अशीही अट घालण्यात आली आहे. तरीही, राज्याच्या विविध भागातून लोक मुंबईत पोहोचू लागले आहेत आणि वातावरण आधीच तापले आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि केंद्र सरकार या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे. कारण हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो.
जरांगे पाटलांनी शनिवारी माघार घेतली नाही तर मुंबईत सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर सर्व खापर पोलीसांवर फोडून हे आंदोलन मोडून काढण्याशिवाय सरकारकडे पर्याय राहणार नाही. सरकारने जर आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम राज्यभरात उमटतील याची कल्पना सरकारला असेल असे अनेक राजकीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता संपुर्ण लक्ष राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाकडे लागले असून आंदोलन चिघळू नये अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिली आहे.
- 1500 पोलिसांचा फौजफाटा
आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील दोनशे ते अडीचशे अधिकाऱ्यांसह 1500 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या, महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकं तैनात ठेवण्यात आली आहे. याशिवाय श्वान पथकांच्या माध्यमातूनही सदर परिसरात तपासणी करण्यात येत आहे. महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, शीघ्रकृती दलाची पथकंही तैनात आहेत.
- ओबीसी आरक्षण काढून देता येणार नाही
कुणाचही आरक्षण कमी न करता, कुणालाही नुकसान न होऊ देता, जे योग्य आणि शक्य आहे ते सरकार करेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मी दिलं, कुणबी नोदीं केल्या. मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम शिंदे समिती आजही करत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले ते हायकोर्टात टिकले. मात्र, सुप्रीम कोर्टात काही लोकांमुळे ते टिकलं नाही. महाविकास आघाडीचे जेव्हा सरकार होते, तेव्हा त्यांनी बाजू मांडायला पाहिजे होती, ती त्यांनी मांडली नाही. ज्या सुविधा ओबीसी समाजाला मिळतायेत त्या मराठा समाजालाही आम्ही देतो. जे योग्य आहे, नियमात बसतंय, त्यासाठी सरकार अजूनही सकारात्मक आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली.
- मी तर संपणार नाहीतर आरक्षण तरी घेणार
ही लढाई आता आरपारची आहे, मागे हटणार नाही. एकतर सरकारला आरक्षण द्यावं लागेल किंवा उपोषण करुन मी तरी मरणार, पण मागे हटणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले. आता फक्त आरक्षण घेणार नाही तर त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले.
- फडणवीसांवर टिका
फडणवीस आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार काय ते शिकवतात, पण त्यांचे कर्तृत्व काय असा सवाल जरांगे यांनी केला आहे. त्यांनी धनगरांना फसवलं आणि अजून आरक्षण दिलं नाही. कैकाडी समाज हा पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे, मराठवाड्यात ओबीसी आहे. तर इतर ठिकाणी वेगळ्याच प्रवर्गात आहे. कैकाडी समाज एकाच राज्यात तीन प्रवर्गात आहे हे फडणवीसांचे कर्तृत्व. मराठ्याची एक मुलगी ओबीसी आणि दुसरी जनरल प्रवर्गात, हे तुमचं कर्तृत्व. शेतकरी आत्महत्या करतात हे फडणवीसांचा कर्तृत्व.
- सरकारने हॉटेल बंद केली, पाणीही मिळू दिलं नाही
मनोज जरांगे म्हणाले की, “आम्ही आरक्षणासाठी आंदोलन करतोय, पण या ठिकाणची खाऊ गल्ली, हॉटेल बंद करण्यात आले, पाण्याचीही सोय करण्यात आली नाही. आंदोलकांना चहा-पाणी, जेवण मिळू नये म्हणून हे सगळे करण्यात आलं. त्यांना स्वच्छतागृहे मिळू नयेत यासाठी प्रयत्न केलं. आम्ही सरकारशी सहकार्य केलं, त्यांच्या नियमांचे पालन केलं. पण हे सरकार इंग्रजांपेक्षा बेकार आहे. सरकारने आडमुठेपणा केला तर आम्हीही आडमुठेपणा करणार.
- कायदेशीर मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न-फडणवीस
मनोज जरांगे उपोषणाला बसलेत, शासनही सहकार्य करेलच मात्र काही ठिकाणी आंदोलकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. त्याचा फटका वाहतूक कोंडीला बसला. काही जणांमुळे आंदोलनाला गालबोटं लागतं. कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस परवानगीचा सकारात्मक विचार करतील. कोर्टाच्या आदेशानुसार प्रशासन सकारात्मक विचार करेल. मराठा आंदोलकांच्या मागण्याबद्दल मार्ग काढण्याचा सरकारचा विचार आहे. कायदेशीर मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai